आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथे संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आटपाडी येथे बेकायदा चर्च बांधले आहे. वरद हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील अश्विनी जिरे या मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन संजय आणि अश्विनी गेळे या दोघांनी प्रार्थना म्हणल्याची घटना घडली. या प्रकरणी जादूटोणा आणि भोंदूगिरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेनंत्तर हिंदू समाज बांधवांमध्ये मोठी नाराज आहे. शुक्रवारी (दि.३०) हिंदू समाज बांधवांकडून एस. टी. स्टॅन्ड ते तहसिल कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहेत. त्यामुळे धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि बेकायदा चर्चचे बांधकाम काढून टाकावे. गेळे कुटुंबियांच्याकडे आलिशान हॉटेल, जेसीबी आणि पोकलॉड मशीन आणि अनेक ठिकाणी जमिनी अशी संपत्ती आहे. ती कशी आली याची चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
याबाबत लोकभावना अत्यंत तीव्र आहेत. कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देत शासनाने लक्ष द्यावे असा प्रश्न पडळकर यांनी विधानसभेत मांडला. या लक्षवेधी वर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेळे कुटुंबाच्या मार्फत होणारे धर्मांतर आणि चर्चच्या बांधकामाबाबत शासनामार्फत चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही दिली.