मिरज; पुढारी वृत्तसेवा : पीएसआय आणि 50 एकर जमिनीचा मालक असल्याचा बढेजाव मारत दुसरे लग्न केलेला एकजण फरार झाल्याची घटना मिरजेत घडली आहे. संतापलेल्या पहिल्या पत्नीने तिच्या ट्रक चालक पतीच्या अर्थात तोतया पीएसआय विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. मारुती श्रीकांत माने (वय 37, रा. शिंदेवाडी, आरग, ता. मिरज) असे या तोतयाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारुती माने हा ट्रकचालक आहे. त्याचे पहिले लग्न झाले आहे. परंतु असे असताना ही त्याने पीएसआय आणि 50 एकर जमिनीचा मालक असल्याचे सांगून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्या प्रियसीला वेगवेगळ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनातून फिरवून तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिच्यासोबत लग्न केले. लग्न केल्यानंतर मात्र माने याने त्या संबंधित तरुणीस भाड्याच्या खोलीत ठेवून कामावर जात असल्याचे सांगून तेथून पळ काढला.
पहिले लग्न झाले असताना देखील न सांगता दुसरे लग्न केल्याने पहिल्या आणि दुसर्या पत्नीने माने याचे पितळ उघड पाडले आहे. पीएसआय आणि 50 एकरचा मालक असणारा तोतया पीएसआय सध्या फरारी असून त्याच्या विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा