मिरज : पुढारी वृत्तसेवा
मिरजेत शनिवारी रात्री सराईत गुन्हेगार म्हमद्या नदाफ टोळी व मिरजेतील काझी गट यांच्यात तुंबळ मारामारीचा प्रकार घडला. व्यावसायिक वैमनस्य व सावकारी कर्जवसुलीतून नदाफ टोळीने मारहाण केल्याने काझी गटातील तरुणांनी नदाफ टोळीवर हल्ला चढवत एका घराची मोडतोड केली. मिरजेतील खासगी सावकार रुखसाना जमादार हिच्याकडून घेतलेले कर्ज वसुलीसाठी मिरजेतील सर्फराज देसाई यास नदाफ याच्या साथीदारांनी मारहाण केली. यावेळी म्हमद्या नदाफ याने फोनवरून दमदाटी केल्याची तक्रार आहे. या घटनेमुळे संतप्त काझी गटाच्या तरुणांनी शनिवारी सायंकाळी रुखसाना जमादार हिच्या घरावर हल्ला चढवून मोडतोड केली. त्यानंतर रात्री नऊ वाजता मार्केट परिसरात नदाफ टोळी व काझी गट भिडले. यावेळी मार्केट परिसरात धावपळ उडाली. रस्त्यावरील विक्रेत्यांनी पळ काढला. यावेळी लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले. मार्केट परिसरात मारामारी सुरू असताना, दोन्ही गटांशी संबंध नसलेल्या तिघा मंडप डेकोरेटर्स कामगारांना नदाफ टोळीचेच समजून काठ्या व लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी करण्यात आले. पोलिसांनी जमावाला पिटाळून लावले.
याप्रकरणी सौरभ सुरेश कदम (वय 26, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याने शोएब काझी, अक्रम काझी व त्यांच्या चार-पाच साथीदारांनी नीतेश शर्मा, गोपाळ सोनार (रा. सांगली) यांना काठी व लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार मिरज शहर पोलिसात दिली आहे. याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करून अक्रम काझी, रमेश कुंजिरे, मोहम्मद युसुफ चमन शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसर्या गटाचे मोहम्मद युसुफ ऊर्फ शोएब साहेबपीर चमनमलिक काझी यांनी म्हमद्या नदाफ व रुक्साना जमादार यांच्याविरुद्ध, धमकी देऊन दरमहा 20 हजार रुपये खंडणीची मागणी केल्याची तक्रार दिली आहे.
म्हमद्या नदाफ व दोन अनोळखी व्यक्तींनी नूर हॉटेलसमोर येऊन चमनमलिक काझी यांना, रुक्साना जमादारच्या धंद्याच्या आडवे का येतोस, असे म्हणून 20 हजार रुपये महिन्याला दे, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी म्हमद्या नदाफ व रुक्साना जमादार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.