सांगली

Sangali congress | महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर खानापूर काँग्रेसचा मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

विटा: वाढती महागाई, इंधन दरवाढ, गॅस टंचाई, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, महिलांच्या अडचणी आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका काँग्रेस कमिटी व विटा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. काँग्रेस कमिटीपासून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे आणि मागण्यांचे फलक घेऊन मुख्य चौकमार्गे प्रशासकीय कार्यालयापर्यंत कूच केली. या आंदोलनात विटा शहराध्यक्ष सुरेश पाटील, विठ्ठलराव साळुंखे, अशोकराव साळुंखे, सुधीर जाधव, उदय थोरात, मच्छिंद्र महापुरे, नंदकुमार आईवळे, शंकरराव फाळके, हरिराम माने, पवन सुतार, सुधीर पोतदार, अरविंद गायकवाड, दशरथ साळुंखे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्यांचे जीवन कठीण; शासनाच्या धोरणांवर टीका

मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर तीव्र शब्दांत टीका केली. या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जीवन अत्यंत कठीण झाले असून, शेतकरी उत्पादन खर्च वाढल्याने पुरता संकटात सापडला आहे. दुसरीकडे, सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. तसेच, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजनांचा लाभ अनेक गरजू महिलांपर्यंत पोहोचत नसल्याने शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

  • इंधन, पेट्रोल व डिझेलचे दर तातडीने कमी करावेत.

  • गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून बाजारातील टंचाई दूर करावी.

  • अमेरिका देशासोबतचा अंतरिम व्यापार करार रद्द करण्यात यावा, कारण त्याचा मोठा फटका शेतकरी व लघुउद्योगांना बसत आहे.

  • शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा.

  • रासायनिक खते व बियाणांचे वाढते दर नियंत्रित ठेवावेत.

  • 'लाडकी बहीण' योजनेचे मानधन पूर्ववत सुरू ठेवावे आणि अपात्र ठरलेल्या महिलांची पुन्हा फेरपडताळणी करून त्यांना या योजनेत समाविष्ट केले जावे.

  • सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळेपर्यंत दरमहा मासिक बेरोजगारी भत्ता देण्यात यावा.

तीव्र आंदोलनाचा इशारा

या सर्व मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, खानापूर तालुका व विटा शहर काँग्रेस पक्षातर्फे आगामी काळात आणखी तीव्र मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT