Raj Thackeray Criticism on PM Modi Austerity Appeal: राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनावर जोरदार टीका करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमधून राज ठाकरे यांनी देशाची अर्थव्यवस्था, पेट्रोल-डिझेल दर, सरकारी खर्च, परदेश दौरे आणि निवडणुकांमधील खर्च यावर थेट भाष्य केलं.
राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी कमी करा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, गरज नसल्यास परदेश दौरे टाळा आणि वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, असं आवाहन केलं. मात्र, “जनतेला काटकसरीचा सल्ला देताना सरकार आणि सत्ताधारी पक्ष स्वतः किती काटकसर करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी आरोप केला की, देशभरात पंतप्रधान आणि भाजप नेत्यांचे मोठे ताफे, रोड शो आणि प्रचारसभांमध्ये कोट्यवधी रुपयांचा इंधन व पैशांचा खर्च होतो. “ही उधळपट्टी थांबवण्याची तयारी सरकार दाखवणार का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
राज ठाकरे यांनी खनिज तेलाच्या वाढत्या किमतींचाही उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय बाजारात यापूर्वीही कच्च्या तेलाचे दर 90 ते 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेले होते, मात्र त्या काळात अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं. “जेव्हा तेलाचे दर कमी होते, तेव्हाही नागरिकांना महाग पेट्रोल-डिझेल विकण्यात आलं. त्यातून जमा झालेला पैसा नेमका कुठे गेला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी ‘रेवडी संस्कृती’वरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेसह विविध राज्यांमधील निवडणुकांमध्ये लोकांना अशा योजना सांगून मतं मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. “देश आणि राज्यांची अर्थव्यवस्था कमकुवत होत असेल तर अशा योजना थांबवण्याची तयारी सरकार दाखवणार का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
विदेश दौऱ्यांवरूनही राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. “लोकांना परदेशात जाणं टाळा असं सांगताना स्वतः पंतप्रधान 15 मेपासून पाच देशांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आधी स्वतःचे दौरे थांबवा आणि मग जनतेला सल्ले द्या,” असा टोला त्यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा दाखला देत सांगितलं की, युद्धकाळात शास्त्रीजींनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलं होतं, पण त्याची सुरुवात स्वतःपासून केली होती. “आजचे सत्ताधारीही तशी कृती दाखवतील का?” असा सवाल त्यांनी केला.
पत्राच्या शेवटी त्यांनी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत संसदेत विशेष अधिवेशन बोलावून सरकारने देशासमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी केली. “आम्ही विरोधक असलो तरी देशाचे शत्रू नाही. पण प्रश्न विचारणं थांबणार नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी सरकारने आधी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करावी, अशी मागणी केली.