Varandha Ghat Landslide Risk: Pudhari
रायगड

Varandha Ghat Landslide Risk: महाड-भोर-पंढरपूर मार्गावर दरडींचा वाढता धोका

पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद राहण्याची भीती; वरंधा घाटाची दुरुस्ती सुरू

पुढारी वृत्तसेवा

महाड : महाडवरुन पुण्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डी.डी राजेवाडी ते वरंधा भोर महाड या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू असून पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन या पावसाळी मोसमा मध्ये देखील या महामार्गावरील वाहतूक तीन महिने बंद राहणार असल्याची शक्यता असून किती वर्ष या घाटाचे काम चालणार असा सवाल या निमित्ताने स्थानिक रहिवाशी वाहन चालक प्रशासनाला विचारत आहेत. वरंधा घाट हा हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित कधी होईल असा सवाल या परिसरातील नागरिक व वाहतूकदार शासनाला विचारत आहेत.

महाड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा म्हाप्रळ - भोर- पंढरपूर या रस्त्याचे रुंदीकरण चार वर्षापासून सुरू आहे. वरंधा घाट आणि पुणे जिल्हा हद्दीतील रुंदीकरणाचे काम मागील चार वर्षापासून चालू आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहतूकदार तसेच एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

यामुळे या मार्गावर सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात. त्यातच महाड हद्दीमधील पारमाची, माझेरी, गावाजवळ रस्ता जरी बनवून व्यवस्थित झाला असला तरी . 2021 मध्ये याठिकाणी रस्ता वाहून गेला होता. नैसर्गिक दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन ऐन पावसाळ्यात हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतात.

राष्ट्रीय महामार्ग 965. डी.डी राजेवाडी ते वरंधा भोर महाड हा मार्ग मागील वर्षी 1/6/2025 पासून 28/9/2025 या कालावधीत वाहनांच्या वाहतुकी करता पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला होता तशाच निर्णय यावर्षी देखील होण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्हा व पुणे जिल्हा हद्दीतील रुंदीकरणाच्या कामामध्ये अनेक भाग दरड प्रवण क्षेत्र असल्याने नैसर्गिक आपत्ती होऊन दरड कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी व जीवित हानी होण्याचा धोका उद्भवू शकतो म्हणून गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड मध्यम वाहनांच्या वाहतुकीसाठी वरंधा घाट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. रायगड जिल्हा हद्दीतील बहुतांशी काम पूर्णतः गेले असले तरी पुणे जिल्ह्यातील कामाबाबत मात्र प्रश्नचिन्ह अनुत्तरीत आहे ते काम कधी पूर्ण होईल व रस्ता वाहतुकीसाठी कधी पूर्ववत होईल असा प्रश्न या परिसरातील ग्रामस्थांशी वाहन चालकांना पडला आहे.

हवामान खात्यावर निर्णय अवलंबून?

पावसाळ्याच्या कालावधीत हवामान खात्याने रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट दिला नसल्यास सदरचा घाट रस्ता हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला ठेवणे योग्य राहील असे शासनाकडून वेळोवेळी काढण्यात येत असलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात येते मात्र अपघात टाळण्याच्या दृष्टीने वाहतुकीसाठी पावसाच्या कालावधीत बंद करण्यात येतो. या कालावधीमध्ये या रस्त्यावरून जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव निजामपूर ताम्हणी घाट मुळशी पिरंगुट पुणे तर कोल्हापूर कडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर सातारा कराड कोल्हापूर अथवा राजेवाडी फाटा पोलादपूर खेड चिपळूण पाटण कराड कोल्हापूर अशा पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचे आदेश मागील चार वर्ष दर पावसाळ्यात रायगड जिल्हाधिकारी व पुणे जिल्हाधिकारी असे आदेश काढतात.

रायगड हद्दीतील असणारा वरंधा घाटापर्यंतचा रस्त्याचे काम पावसाळा चालू होण्याअगोदर पूर्ण होईल व पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी चालू आहे. मात्र पुणे जिल्हा हद्दीतील काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने पावसाळ्यात हा रस्ता रायगड जिल्ह्यातून जरी चालू असला तरी पुणे जिल्हा हद्दीतील अपूर्ण अवस्थेतील कामामुळे बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंकज गोसावी, उपविभागीय अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT