Bokadvira flyover Pudhari
रायगड

Bokadvira flyover: बोकडवीरा वीजनिर्मिती प्रकल्पाजवळील उड्डाणपूल धोक्यात; दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अपघात होण्याची भीती

द्रोणागिरी नोड परिसरातीलसर्वचउड्डाणपूलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल ममताबादे

जेएनपीए: उरण तालुक्यातील बोकडवीरा येथील एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाच्या बाजूला असलेला उड्डाणपूल अस्तित्व टिकवण्यासाठी आधाराची वाट पाहत उभा आहे. पाच वर्षांपूर्वी अवजड वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मालाचे कंटेनर वेळेत बंदरात पोहोचवण्यासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. मात्र आजघडीला हा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असून वाहनचालक व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

पूलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.प्रत्यक्ष पाहणी केली असता पूलाची दुरवस्था स्पष्ट दिसते. एका बाजूला पूलाच्या मध्यभागी तडे गेले असून तो तब्बल सुमारे एक फूट खचला आहे. तर दुसऱ्या बाजूला पूलाच्या दोन्ही कडेला संरक्षक कठडे तुटले आहेत. उड्डाणपूलाच्या दोन्ही टोकाला भल्या मोठ्या भगदाडांची निर्मिती झाली असून येथून अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू आहे. सध्या या पुलावरून जड वाहतूक बंद करून फक्त हलकी वाहने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने धोका कायम आहे.

द्रोणागिरी नोडमधील धोक्याची मालिका सुरूच आहे.ही परिस्थिती नवीन नाही. 14 मार्च 2021 रोजी द्रोणागिरी नोडमधील सेक्टर 15 मध्ये फुंडे गावाजवळील उरण-जुनाशेवा मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टवरून प्रवास करताना अचानक स्लॅब कोसळल्याने दीपक कसूरकर या तरुणाचा मोटारसायकलसह कोसळून करुण अंत झाला होता.

या घटनेनंतर सिडकोने द्रोणागिरी नोडमधील सेक्टर 15 ते 51 मधील सर्व मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासर्वांची दुरुस्तीसाठी निविदा काढली होती. द्रोणागिरी नोड परिसरात मोठ्या प्रमाणात उड्डाणपूलांची निर्मिती करण्यात आली असली तरी त्यांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला असून चौकशीची मागणी जनतेतून होत आहे.एकिकडे उड्डाणपूलाचे काम सदोष व निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध होत आहे. आता या द्रोणागिरी नोड परिसरातील सर्वच उड्डाणपूलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनतेकडून या सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित ठेकेदारांच्या कामाची सखोलपणे चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणीही जोर धरत आहे. अशा पद्धतीने काम करून घेणाऱ्या अभियंत्यांचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिक, वाहनचालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या उड्डाणपूलाच्या तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक आधार देण्याची मागणी केली आहे. अन्यथा उरणमधील आणखी एक मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. सिडको, एमएसईबी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एमएसईबी प्रकल्प आणि वीज यंत्रणा

बोकडवीरा येथे महानिर्मितीचा औष्णिक वीज प्रकल्प आहे. राज्यात वीजेची मागणी वाढत असताना अशा प्रकल्पांजवळील पायाभूत सुविधा सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. महापारेषणच्या बाभळेश्वर-कुडूस 228 किमी लांबीच्या वीजवाहिनीमुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. मात्र स्थानिक पातळीवर रस्ते व पुलांची अवस्था वाईट असेल तर औद्योगिक विकासाला खीळ बसू शकते.

उड्डाणपूलांच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह

प्रशासनाची भूमिकेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी पावेतो हा पूल परिसरातील उड्डाणपूलांचा काही भाग पडला होता. त्यानंतर चार ते पाच वर्षे पूर्वी जासई गावाजवळील उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू असतानाच काही भाग कोसळून पडला होता. तेव्हापासूनच या भागातील उड्डाणपूलांच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या हा पूल आधाराची आणि अपघात होण्याची वाट पाहत आहे. संरक्षणाच्या दोन बाजूंना ही संरक्षणभिंत तोकडी असल्याने वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT