रायगड : उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या एका महिलेचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी रायगड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने व मोठ्या शिताफीने सत्वर तपास करत, उत्तर प्रदेशातीलच असणाऱ्या दोन आरोपींचा माग काढून त्यांना पुण्यातील पिंपरी परिसरातून अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ही खुनाची घटना कौटुंबिक वादातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे. या घटनेचा पुढील तपास हा पोलीस करत आहेत.
२५ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३५ च्या सुमारास ही घटना घडली. पुणे-माणगाव रस्त्यावरील ताम्हिणी घाटात, कोंडेथर गावाच्या हद्दीत दरीमध्ये २५ ते ३० वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला होता. सुरुवातीला माणगाव पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन व तपासादरम्यान या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी माणगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके तैनात करण्यात आली.
तपास पथकाकडून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटविण्यात आली आहे. मृत महिला (वय २५-३०, सध्या रा. चिखली, मूळ उत्तर प्रदेश) असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी दाेघा आरोपींकडे सखोल चाैकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
कौटुंबिक वादाच्या कारणावरून महिलेला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात आणण्यात आले होते. तेथे ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह घाटातील दरीत फेकून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस पथकाने २४ तासांच्या आत या संपूर्ण खूनाचा उलगडा करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, कौटुंबिक वादाचे मूळ कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास माणगाव पोलीस करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोसई सुरज पाटील, पोसई नरेश निंबाळकर, तसेच सहाय्यक फौजदार संदीप पाटील व एलसीबी तसेच सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील आरोपींना पिंपरीतून ठोकल्या बेड्या या घटनेतील मृत महिलेची ओळख पटल्यानंतर एलसीबीच्या पथकाने वेगाने सूत्रे हलवून संशयितांचा ठावठिकाणा शोधून काढला. पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात सापळा रचून मूळ उत्तर प्रदेशातील असलेल्या दुर्गाप्रसाद प्रजापती (वय २४, सध्या रा. कुंदलवाडी, चिखली, मूळ उत्तर प्रदेश) आणि दिनेशकुमार प्रजापती (वय २७, सध्या रा. कुंदलवाडी, चिखली, पुणे; मूळ रा. सिमराबडसिया, उत्तर प्रदेश) या दोन आरोपींना पोलिसांनी शिताफीने २४ तासांमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.