तळा : संध्या पिंगळे
तळा तालुक्यात पावसाची चाहूल लागत आहे. हे पक्षी व निसर्ग यांच्यातील बदलाने शेतकरी अंदाज वर्तवित असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाने बळीराजा शेतीच्या मशागती बरोबरच आपल्या शेतात कोणकोणती पिके भातशेतीला पुरक होईल याचेही नियोजन करत आहेत.
भातशेतीचे बांध बंदीस्त, कुंपण घालणे, धुळवडवाफे तयार करणे, घराच्या शेजारील परसावात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने कुंपण घालून आळी तयार करून ठेवणे. पावसाळ्यात शेतीत पाणी अधिक झाल्यास त्याचा निचरा कसा होईल.
ज्या शेतीत पाणी राहात नाही त्या शेतात पाणी कसे थांबविता येईल या दृष्टीने नियोजन व कामे शेतकरी करत आहे. तालुक्यातील शेतीही डोंगराळ भागातील अधिक असल्याने शेतीचे जंगली माकडे, डुक्कर इत्यादी प्राण्यांपासून नुकसान होत असते त्यादृष्टीने उपाय कसे करता येतील हे नियोजन ही महत्वाचे आहे.
तालुक्यात काही भागात आजही भाजीपाला लागवड केलेली आहे. त्यातून चांगले उत्पन्नही मिळत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या भागात ज्याठिकाणी पाणी आहे. त्याठिकाणी माठाची भाजी व इतर पालेभाज्या व मिरचीचे पिक चांगले उत्पन्न देत असते. त्या दृष्टीने थोड्या खर्चात व कमी मेहनतीने हे पिक आम्ही स्वतः घेतले चांगले उत्पन्न मिळाले आहे.रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही शेतकरी खरिपासाठी कोणते भात पिक व बियाणे वापरावे याचे नियोजन करीत आहेत.
बांधावर भेंडी, टॉमेटो, मिरची लागवड
आता मान्सूनचा पाऊस थोड्याच काळावधीत सुरू होईल. तेव्हा भातशेतीचे बांध व मशागत सध्या चालू असून या भात शेतीबरोबर शेताच्या बांधावर भेंडीची लागवड, टॉमेटो, मिरची इत्यादी नियोजना प्रमाणे लागवड करून चांगल्या प्रकारे पिक घेणार आहे. मागील वर्षीही असे प्रयोग यशस्वी झाले आहेत. अशा प्रकारे चांगले उत्पन्न मिळेल असा अंदाज सांगितला आहे. त्याच बरोबर आपल्या शेतीत चांगले उत्पन्न मिळते. कष्ट व मेहनत महत्वाची आहे, असे शेतकरी सांगतात.