तळा : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच व होळी नंतर उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने या उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांची पाऊले थंडपेयांच्या दुकानांकडे वळली आहेत. उन्हातून काम करताना थकलेल्या शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांकडून थंड पेयांना पसंती मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
यासाठी तळा बाजारपेठेत मोसंबी, ऑरेंज, पाईनऍपल, लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस यांसारखे विविध थंडपेये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या थंड पेयांच्या किमतीत वाढ झाली असून वाढलेल्या फळांच्या किंमतीचा फटका थंड पेयांना देखील बसला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ज्यूस च्या वाढलेल्या किमतीचं प्रमुख कारण म्हणजे फळांचे वाढलेले दर. गतवर्षी च्या तुलनेत यावर्षी फळांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्ये 160 रु. प्रतिकिलो मिळणारे सफरचंद आता 200 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहेत.
पूर्वी 60 रुपये किलो मिळणारे अननस आता 140 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहे. यांसह संत्री व मोसंबीच्या दरातही वाढ झाली असून 90 रुपये प्रति किलो मिळणारे संत्री व मोसंबी आता 130 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहेत. फळांच्या या वाढलेल्या दरामुळे बाजारपेठेत ज्युसच्या किमतीही वाढल्या आहेत.
उष्णतेपासून वाचण्यासाठी लस्सी आणि ताकाचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच बहुतांश नागरिकांना जेवल्यानंतर लस्सी अथवा ताक हे लागतेच. परंतु लस्सी आणि ताक पिणे देखील आता महागले आहे. उष्णतेचा पारा वाढल्यामुळे बऱ्याचदा दुधावर त्याचा परिणाम होऊन दूध खराब होते. व याचा फटका विक्रेत्याला बसतो. त्यामुळे लस्सी आणि ताक महाग झाला असून गेल्यावर्षी 10 रुपये प्रमाणे मिळणारा ग्लास आता 20 रुपयांना मिळत आहे.