पालीः शरद निकुंब
सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, या निकालांनी तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. जांभूळपाडा गटात भाजपला मोठा धक्का बसला असून खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा धैर्यशील पाटील यांचा शिवसेना (शिंदे गट)च्या शर्मिला शरद बोडके यांनी दणदणीत पराभव केला आहे.
जांभूळपाडा गटात झालेल्या या प्रतिष्ठेच्या लढतीत शर्मिला शरद बोडके यांना 10,060 मते मिळाली, तर भाजपच्या नीलिमा धैर्यशील पाटील यांना 7,129 मते मिळाली. तब्बल 2,931 मतांच्या फरकाने शर्मिला बोडके विजयी झाल्या. तालुक्याबाहेरून आणलेल्या उमेदवाराला स्थानिक मतदारांनी नाकारल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
जांभूळपाडा गणात भाजपच्या जागृती राजेश मानकर यांनी शेकापचे अतिश गोविंद सागळे यांचा पराभव केला. जागृती मानकर यांना 4,178 मते मिळाली, तर अतिश सागळे यांना 3,365 मते मिळाली. 813 मतांनी जागृती मानकर विजयी झाल्या.
परळी गणात शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रणिता राजेश परदेशी यांनी भाजपच्या सुनंदा विठ्ठल सिंदकर यांचा पराभव केला. प्रणिता परदेशी यांना 5,683 मते मिळाली, तर सुनंदा सिंदकर यांना 3,095 मते मिळाली. 2,588 मतांनी प्रणिता परदेशी विजयी झाल्या.
राबगाव गणात भाजपच्या सुनीता किसन लेंडी यांनी शेकापच्या मनिषा भरत डोके यांचा पराभव केला. सुनीता लेंडी यांना 4,188 मते, तर मनिषा डोके यांना 3,242 मते मिळाली. 946 मतांनी भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला.
राबगाव गटात भाजपचे चंद्रकांत कृष्णा वारगुडा यांनी शेकापचे काशिनाथ ताया हंबीर यांचा पराभव केला. चंद्रकांत वारगुडा यांना 9,807 मते, तर काशिनाथ हंबीर यांना 7,933 मते मिळाली. 1,874 मतांच्या फरकाने वारगुडा विजयी झाले.
अडुळसे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश परशुराम शेवाळे यांनी शेकापच्या मिलिंद भिकू शेळके यांचा पराभव केला. संदेश शेवाळे यांना 5,690 मते, तर मिलिंद शेळके यांना 3,672 मते मिळाली. 2,018 मतांनी संदेश शेवाळे विजयी झाले.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषवाजी करत गुलाल उधळत मिरवणूक काढली.पोलिसांनी सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात केला होता.