Healthcare neglect in Shriwardhan
श्रीवर्धन : भारत चोगले
कोकण किनाऱ्यावरील ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध श्रीवर्धन तालुका. राज्यातील एक रत्न, पण आरोग्याच्या बाबतीत मात्र अद्याप मागासलेला. विकासाचे अनेक प्रकल्प तालुक्यात सुरु असले, रस्ते, बंदरे, पर्यटन यांना चालना मिळत असली तरी आरोग्यसेवेचा पाया आजही डळमळीत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
तालुक्यात 43 गावे, 26 ग्रामपंचायती आणि 60 हजारांहून अधिक लोकसंख्या असतानाही अत्याधुनिक आरोग्यसेवेचा अभाव तीव्रतेने जाणवतो. उपजिल्हा रुग्णालय केवळ नावापुरते कार्यरत; डॉक्टरांची कमतरता, स्वच्छतेचा अभाव, औषधांचा तुटवडा आणि तांत्रिक उपकरणांची अडचण - हे वास्तव दररोज जनतेसमोर उभं राहतं.
हृदयरोग, अपघात किंवा प्रसूतीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत खउण नसल्याने रुग्णाला माणगाव, पनवेल किंवा थेट मुंबईपर्यंत हलवावं लागतं. परंतु तीन ते पाच तासांचा हा प्रवास रुग्णासाठी अनेकदा ‘जीव आणि मृत्यू’ यामधली धाव ठरतो. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला, अशा घटना गावोगावी सांगितल्या जातात.
श्रीवर्धनला हृदयरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोग, स्त्रीरोग आणि पॅथॉलॉजी तज्ज्ञांची गरज आहे. शासनाने याबाबत ठोस आराखडा तयार करावा, स्थानिक डॉक्टरांना प्रोत्साहन द्यावे आणि खासगी-सरकारी भागीदारीतून एक अत्याधुनिक मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारावे, ही जनतेची एकमुखी मागणी आहे.
राजकारण, पर्यटन आणि विकासाच्या गदारोळात आरोग्य हा मूलभूत अधिकार विसरला जाऊ नये, अशी जनतेची भावना वाढत चालली आहे. खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, आणि मादी आमदार अनिकेत तटकरे या तिघांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत, मात्र आरोग्य क्षेत्रात अद्याप अपेक्षित बदल दिसून येत नाहीत.
आरोग्यसेवा ही श्रीवर्धनच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. तालुक्यातील नागरिक, सामाजिक संघटना आणि वैद्यकीय जाणकार यांचे म्हणणे एकच अत्याधुनिक मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी ही फक्त मागणी नाही, ती काळाची गरज आहे. 24 तास डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, आपत्कालीन विभाग, अँब्युलन्स नेटवर्क आणि रक्तसाठा यांची उपलब्धता सुनिश्चित झाली तरच श्रीवर्धन तालुका खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित आणि सक्षम’ होईल.
मानवी जीवन मोलाचे
श्रीवर्धनच्या किनाऱ्यापासून दांड्यापर्यंत, हरिहरेश्वरपासून दिघीपर्यंत - प्रत्येक गावात एकच चर्चा सुरू आहे विकासाच्या योजनांइतकाच आरोग्याचाही पाया मजबूत हवा, कारण बंदरे, रस्ते, पर्यटन हे अर्थव्यवस्थेचे इंजिन असले तरी मानवी जीवन वाचवणे हेच खरी लोकसेवा आहे.