

Tulsi Vivah celebration in local train
ठाणे : लोकल ट्रेन म्हटली की गर्दी, गोंधळ, लोकल पकडण्याची घाई असे नेहमीचेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून अंबरनाथकडे निघालेल्या संध्याकाळी 6 वाजून 12 मिनिटाच्या लोकलमध्ये या नेहमीच्या वातावरणापेक्षा वेगळेच वातावरण बघायला मिळाले.
प्रवाशांच्या हातात अक्षता, तरुण गायिका सानिका कणसे हिच्या सुरेल आवाजात सुरू असलेल्या मंगलाष्टका, अंतरपाट अशा सर्व गोष्टींनी लोकलमधील वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. निमित्त होते डोंबिवलीच्या त्रिमुर्ती सेवा प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तुळशी विवाह सोहळ्याचे. लोकलमध्ये रंगलेला हा तुळशी विवाह सोहळा प्रवाशांना अनोखी अनुभूती देऊन गेला.
दिवाळी सण संपताच सुरुवात होते ती तुळशी विवाहाची परंतु तुळशी विवाह सद्यस्थितीनुसार फक्त घरापुरते अथवा आंगणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. असे उदाहरण डोंबिवलीच्या या भजनी मंडळाने या सोहळ्यातून दाखवून दिले आहे. असा उत्साही आनंदमय तुळशी विवाह सोहळा पाहत प्रवाश्यानीही या तुळशी विवाह सोहळ्यासाठी चांगला प्रतिसाद यावेळी दिला.
त्या डब्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या म्हणण्यानुसार नेहमीचे घाई आणि गड्बडीचे वातावरण असतानासुद्धा अशा सामाजिक व दैविक वातावरणामुळे अनेक विचारांनी त्रस्त असलेल्या प्रवाशांना तात्पुरता आनंदाचा क्षण मिळत होता, असे इतर प्रवाश्यांनी मत व्यक्त केले. यावेळी भजनी मंडळासहित इतर प्रवाश्यानी देखील हा विवाह सोहळा अत्यंत आनंदात आणि उत्साहात अनुभवला.
लोकलचा डबा सजवला मंडपाप्रमाणे...
त्रिमूर्ती भजनी मंडळाने आणि डब्यात उपस्थित प्रवाश्यांनी सर्वप्रथम लोकल डब्ब्याची साफसफाई करत लोकल डब्याला छान प्रकारे सजवले. गोंड्याच्या फुलांची माळ, प्लास्टीकची नक्षीदार झालर आणि इतर सजावटीच्या सामानाने लोकलचा डबा अक्षरश: विवाह मंडपाप्रमाणे सजवण्यात आला. मग तुळशीचे छोटेसे रोपटे आणून अंतरपाटसहित आणि मंगलाष्टक आणि भावनिक वातावरणासोबत आगळेवेगळा तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यात आला.