Shivrajyabhishek 2026 pudhari
रायगड

Shivrajyabhishek 2026| 'राज्याभिषेक सोहळा हा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन... सगळ्या पातशाह्या तुडवून स्वराज्य निर्माण केलं'

Anirudha Sankpal

Shivrajyabhishek 2026: छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी दूर्गराज रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला. हा राज्याभिषेक सोहळा दर वर्षी साजरा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे ६ जून रोजी रायगडावर जातात. त्यावेळी ते तेथून तमाम शिवभक्तांना संबोधित करत असता.

यावर्षी देखील संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित शिवप्रेमींना भावनिक साद घातली. त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व शिवभक्तांना अभिवादन केलं. यानंतर त्यांनी भावूक भाषण करताना शिवराज्याभिषेक हा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन असल्याचं वक्तव्य केलं.

जनसागर नसून हा शिवसागर

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी शिवभक्तांचा महासागर दूर्गराज रायगडला आला आहे. पण मला आता आपले शब्द बदलूया असं वाटतंय हा जनसागर नसून हा शिवसागर आहे. इथं राहण्याची सोय नाही आम्ही ते करू शकत नाही. जेवणाची देखील मोजकीच सोय तरी शिवभक्त दूर्गराज रायगडला जाणं क्रमप्राप्त समजतो म्हणून तीन चार तारखेपासून इथं मुक्कामी आहेत.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, मला आजही पटत नाही की रात्री शिवभक्त कुठं अन् कसे झोपले होते, कसे सकाळचे विधी आटपत असतील हा फार मोठा प्रश्न आहे. ३०० वर्षानंतर कोणासाठी असं करायला कोण जाईल का? या शिवभक्तांची ही ताकद आहे. म्हणूनच मी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं आलो आहे. मला अजून एक भावूक बोलायचं आहे.

मी रक्ताचा विचाराचा वारसदार आहेच मात्र..

मी शिवाजी महाराजांचा रक्ताचा विचारांचा वारसदार आहेच. मात्र मला आज या शिवभक्तांना देखील वंदन करायचं आहे. आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे म्हणून देशाच्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून ते वंदन करण्यासाठी इथं आले आहेत.

ज्या ठिकाणी आज मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा पुतळा पहावयाला मिळतो तिथंच शिवाजी महाराज छत्रपती झाले. आपल्याला राज्याभिषेकाचे महत्व समजून घेतलं पाहिजे. हा काही साधारण दिवस नाही तर अनन्यसाधारण दिवस आहे. सगळ्या पातशाह्यांना तुडवून गुलामगिरीतून मुक्त करून शिवाजी महाराज छत्रपती झाले. हा राज्याभिषेक जरी त्यांचा असला तरी खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं. नवीन पर्व सुरू झालं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी नवीन शक सुरू केलं.

किल्ला नाही तर दूर्गराज रायगड

सोन्याचे स्वतःचे पाहिजे हा मेसेज या राज्याभिषेकातून जगाला देण्यात आला. हा क्रांतिकारी विचार आहे. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून राज्याभिषेकासाठी रायगडाचीच निवड केली. आणि हीच माझी राजधानी होणार असं सांगितलं. म्हणून हा फक्त रायगड किल्ला नाही तर दूर्गराज रायगड आहे.

पहिला स्वातंत्र्य दिवस राज्याभिषेक दिन

संभाजीराजेंनी राज्याभिषेक हा आपल्यासाठी पहिला स्वातंत्र्य दिवस असल्याचं देखील सांगितलं. ते म्हणाले, '१९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आपल्यावर १५० वर्ष ब्रिटीशांचे राज्य होते. तो स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहानं साजरा केला गेला पाहिजे. मात्र आपल्या सर्वांना हे विसरून चालणार नाही की आपल्याला या सगळ्या शाह्यांकडून, धर्मांद इस्लामशाहीची लोकं आपल्यावर चालून आले होते त्यांना बाहेर काढून आपलं स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणून माझ्या दृष्टीकोणातून भारताचा पहिला स्वातंत्र्य दिवस कोणता असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन हा आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT