रायगड : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी. जिल्हा परिषद शाळांना गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीने एक अभिनव योजना सुरु केली आहे. यात ग्रामपंचायत हद्दीतील पालकांनी आपल्या पाल्याचा ग्रा.पं. हद्दीतील जिल्हा परिषद अंगणवाडी अथवा शाळेमध्ये प्रवेश घेतल्यास त्यांची चालू वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यात येणार आहे. शुक्रवारी आयोजित केलेल्या ग्रामसभेत सरपंच गणेश गावडे यांनी याबाबत माहिती दिली. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीची 26 जानेवारीची तहकुब ग्रामसभा शुक्रवारी (27 फेब्रुवारी) गोंधळपाडा समाजमंदिर येथे सरपंच गणेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेला उपसरपंच आरती पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नितेश तेलगे, पंचायत समिती सदस्य समाधान वार्डे, ग्रामपंचायत सदस्य उद्धव भितळे, अक्षरा पुजारी, वेदिका गोतावडे, ग्रामस्थ चारुहास मगर, मंगेश माळी, महादेव जाधव, शिक्षक, अंगवाडीसेविका, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.
या ग्रामसभेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, आमचा गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत सन 2026-27 च्या आराखड्यास अंतिम मंजुरी देणे, बालविवाह प्रतिबंध जनजागृती, मेरा गाव मेरा धरोहर क्षेत्रीय सर्वेक्षणाला मान्यता देणे या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. आयत्या वेळच्या विषयात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हद्दीतील पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, शौचालय बांधकाम या विषयांवर मुद्दे उपस्थित केले. यावर सभेचे अध्यक्ष गणेश गावडे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच विकासकामांबाबत आश्वासित केले.
वेश्वी ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी तब्बल 15 कोटींची निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला. तर नुकत्याच झालेल्या अलिबाग तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत आक्षी मतदारसंघातून विजयी झालेले जयंत वार्डे यांचा यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सभेच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या ग्रामसभेमध्ये गोंधळपाडा मराठी शाळेचे उपशिक्षक दीपक पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नमूद केले. यावर माहिती देताना सभेचे सरपंच गणेश गावडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची पटसंख्या वाढीसाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद, अंगणवाडी आणि शाळांमध्ये दाखल करावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून त्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून एक योजना सुरु करीत आहोत. ग्रामपंचायत हद्दीतील जे पालक आपल्या पाल्यांना येथील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी अथवा शाळांमध्ये दाखल करतील त्यांची चालू वर्षांतील घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यात येईल. ग्रामपंचायत हद्दीतील पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करावे. ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा शाळांना सर्व सुविधा देण्यात येतील, असे आश्वासनही गणेश गावडे यांनी दिले.
ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची पटसंख्या वाढीसाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद, अंगणवाडी आणि शाळांमध्ये दाखल करावे यासाठी आम्ही प्रयत्न असून त्यासाठी वेश्वी ग्रामपंचायत येत्या शैक्षणिक वर्षापासून एक योजना सुरु करीत आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जे पालक आपल्या पाल्यांना येथील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी व शाळांमध्ये दाखल करतील त्यांची चालू वर्षांतील घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यात येईल. त्यामुळे पालकांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.गणेश गावडे, सरपंच, वेश्वी