महाड ः युती आणि आघाड्याचे समीकरण जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणूकीत जमले नसल्याने महाड आणि पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या पक्षीय लाटेपेक्षा पूर्णपणे व्यक्ती केंद्रित ठरणार आहेत, हे सध्याच्या राजकीय हालचालींवरून स्पष्ट दिसत आहे. परिणामी निकाल देखील धक्कादायक लागतील असे मत जाणकारांचे आहे.
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील मतदारांचा स्वभाव पाहिला तर ते केवळ पक्षाचे नाव, झेंडा किंवा नेत्यांची भाषणे पाहून निर्णय घेत नाहीत. उलट ,हा उमेदवार आपल्या गावासाठी काय करतो?, आपल्या अडचणीच्या वेळी तो उपलब्ध होता का?, पाणी, रस्ते, पूर, रोजगार, आदिवासी व डोंगराळ भागातील प्रश्नांवर त्याची भूमिका काय होती? हे प्रश्न मतदार आधी स्वतला विचारतात. त्यामुळे मोठ्या पक्षाचा उमेदवार असूनही, जर त्याने स्थानिक पातळीवर विश्वास निर्माण केला नसेल, तर मतदार त्याला सहज नाकारू शकतात.
महाड आणि पोलादपूरमध्ये राजकारण हे अत्यंत स्थानिक समीकरणांवर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी एकाच पक्षातील जुने वैयक्तिक वाद, विकासकामांवरील नाराजी किंवा दुर्लक्षित भाग यामुळे मतदार पक्षाचा विचार न करता व्यक्तीला मत देतो. याच कारणामुळे क्रॉस व्होटिंगचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे, जे महाड नगर परिषद निवडणुकीत प्रत्यक्षात दिसून आले होते.
तिरंगी व चौरंगी लढतींमध्ये तर ही बाब अधिक ठळक होते. अशा वेळी मतदार, कुणाचा पक्ष कोणता यापेक्षा कुणाला विजयी करायचे किंवा कुणाला रोखायचे या मानसिकतेतून मतदान करतो. त्यामुळे स्थानिक नवखा उमेदवारही मजबूत पक्षीय उमेदवारांना कडवी टक्कर देऊ शकतात.
यामुळे भाजप, ठाकरे शिवसेना किंवा काँग्रेस कोणत्याही पक्षाला फक्त संघटनबळावर विजय मिळवणे अवघड जाणार आहे. स्थानिक स्वीकारार्हता, वैयक्तिक प्रतिमा, कामाची पावती आणि जनतेशी थेट नाते असलेला उमेदवारच या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.एकूणच, महाड व पोलादपूरमध्ये ही निवडणूक पक्षाची नव्हे, तर व्यक्तीची कसोटी ठरणार, आणि याच वास्तवावर अंतिम निकाल अवलंबून राहणार, असे मत महाड मधील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.