अलिबाग: नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या रायगड जिल्ह्यात पावसाळ्याप्रमाणे वसंत ऋतूमध्येही मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध असतो. अलिबागमधील नागरिकांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहून टाकणारा रानमेवा म्हणजे ताडगोळे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात या ताडगोळ्यापासून अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. तसंच ताडगोळ्याचे अनेक फायदे असल्याने पर्यटक आणि नागरिकही याकडे आकर्षित होत आहेत. उष्णता वाढल्यामुळे ताडगोळ्यांना मागणी वाढली आहे.
लिचीप्रमाणे पारदर्शक असलेले हे फळ शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि चवदार असल्याने ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या अनेक ताडाच्या झाडांना वसंत ऋतूमध्ये ताडगोळे येतात. या ताडगोळ्यांची विक्री करुन येथील अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात.
त्यामुळे ताडाच्या झाडाची लागवड आणि ताडगोळ्यांची विक्री हा सध्या शेतीला पूरक आणि पर्यायी व्यवसाय बनला आहे. अलिबागमध्ये रस्त्याच्या कडेला ताडगोळयांची विक्री सुरू असल्याचे पहायला मिळते. या ताडगोळ्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. रायगड जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात पिकणारया ताडगोळ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
कोकण किनारपटटीवर नारळी पोफळी प्रमाणेच ताडाची झाडेही मोठया प्रमाणावर आहेत . रायगड जिल्हयातील अलिबाग चौल , रेवदंडा परीसरात ही झाडे पहायला मिळतात . त्याला येणारया छोटया नारळासारख्या फळांना ताडगोळे म्हणतात. ताडाची झाडे दिवसेंदिवस कमी होत चालली असली तरी आजही अनेकजण आपला हा पारंपारीक व्यवसाय सांभाळून आहेत.
चौल येथील निलेश काठे यांच्या शेतावर ताडाची 50 झाडं आहेत. त्यातून त्यांना वर्षाला दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. या फळातील गर पाणीदार आणि चवदार असतो . थंडावा देणारे फळ असल्याने उन्हाळयाच्या दिवसात त्याला चांगली मागणी असते.
ताडगोळ्याचे फायदे
ताडगोळे चवदार आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी असे समजले जातात. निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. ताड गोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. त्यामुळे एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं.