अलिबाग : रमेश कांबळे
शिमगोत्सव आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी जिल्ह्यात एकूण 4 हजार 80 होळ्या उभारल्या जाणार असून त्यामध्ये 2 हजार 940 सार्वजनिक आणि 1 हजार 120 खासगी होळ्यांचा समावेश आहे. पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा शिमगोत्सव कोकणात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी मुंबईसह विविध ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल झाले आहेत.
रविवार, होळी पौर्णिमा आणि धूलिवंदन अशा सलग सुट्यांमुळे जिल्ह्यात पर्यटकांचीही मोठी गर्दी झाली आहे. समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे तसेच बाजारपेठा रंग, पिचकाऱ्या आणि विविध आकर्षक वस्तूंनी सजल्या आहेत. धुळवडीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक व रासायनिक रंग, पाण्याच्या पिचकाऱ्या, फुगे यांची विक्री वाढली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी सण उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. शांततेत आणि सुरक्षित वातावरणात शिमगोत्सव पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनीही जबाबदारीने सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
होलिकोत्सव आणि धुळवडीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलिस विभागाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्यात येत आहे. बंदोबस्तासाठी 89 पोलिस अधिकारी, 614 पोलिस अंमलदार, 3 रायट कंट्रोल पथके (आरसीपी), 8 स्ट्रायकिंग फोर्स आणि 40 वाहतूक अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रमुख चौक, पर्यटनस्थळे आणि समुद्रकिनाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची अतिरिक्त नेमणूक करण्यात आली आहे.