Raigad Rice Farming Pudhari
रायगड

Raigad Rice Farming: रायगडमध्ये भात शेतीचे क्षेत्र घटतेय; उत्पादनातही मोठी घसरण

लाखो हेक्टरवरून 83 हजार हेक्टरवर लागवड; सिंचनअभावी व शहरीकरणामुळे संकट गडद

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

भात शेतीबमध्ये वेगवेगळे प्रयोग कृषी विभागाकडून होतात. भाताचे नाणीं वाण आणून त्यावर प्रयोग केले जातात असे असले तरी त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही . पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेल्या रायगड जिल्ह्यात भात शेतीचे क्षेत्र मात्र दिवसेंदिवस घटत होताना दिसत आहे.

रायगड जिल्हा हा भात उत्पादन करण्यात पूर्वी अग्रेसर होता. जिल्ह्यातून तांदूळ विकण्यासाठी मुंबईत शेतकरी जात होता. रायगडाच्या तांदळाला मागणीही अधिक होती. मात्र जिल्ह्यात कालांतराने झालेल्या शहरीकरण, औद्योगिकीकरण, महामार्ग यामुळे हळू हळू शेत जमीन कमी होऊ लागली आहे. त्यामुळे लाखो हेक्टरवर पूर्वी होणारे भात लागवड क्षेत्र आता हजारावर येऊ लागले आहे. गेल्या चार वर्ष भाताचे उत्पादन हे 2800 प्रति हेक्टर किग्र उत्पन्न होते. मात्र यंदा यात मोठी घट झाली असून 2081.32 प्रती हेक्टर किग्र उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे भाताच्या उत्पन्नात कमालीची घट होऊ लागली आहे. त्यामुळे पुढील काळात भात शेती नष्ट होणार काय अशी भीती निर्माण झाली आहे.

रायगड हा भात पिकावर अधिक भर देणारा जिल्हा आहे. खरीप हंगामात जिकडे तिकडे भाताची हिरवीगार शेती पाहायला मिळते. पूर्वी लाखो हेक्टरवर भात लागवड क्षेत्र असल्याने भाताची मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. त्यामुळे भाताचे कोठार म्हणून रायगडची एकेकाळी ओळख होती. मात्र आज भात लागवड क्षेत्र कमी झाल्याने ही ओळख पुसू लागली आहे.

एकीकडे जिल्हा हा शहरीकरणाकडे वळत असताना शेत जमिनी हळूहळू नष्ट होऊ लागली आहे. जिल्ह्यात महाड, रोहा, पाताळ गंगा, रसायनी, खोपोली, खालापूर, माणगाव, अलिबाग, तळोजा याठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे. जिल्ह्यात मुंबई गोवा, मुंबई पुणे महामार्ग, माणगाव दिल्ली कॉरिडॉर, निजामपूर दिघी, माणगाव दिघी हे महामार्ग झाले आहेत. या महामार्ग मध्ये हजारो हेक्टर जमीन भुसंपदीत झाली आहे.

रेवस रेड्डी हा महामार्ग प्रस्तावित आहे. तसेच अलिबाग विरार कॉरिडॉर साठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अजून शेत जमीन भूसंपादन केली जाणार आहे. त्यामुळे अजून भात लागवड क्षेत्र कमी होणार आहे. त्यात नवीन प्रस्तावित प्रकल्प येत असल्याने त्यासाठीही शेत जमीन भूसंपदित केली जाणार आहे. पूर्वी हजारो हेक्टर जमिनी प्रकल्पासाठी घेऊन त्यात प्रकल्प न उभारल्याने त्या पडीक झाल्या आहेत. त्यामुळे भात लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. ही भविष्यासाठी चिंतेची बाब आहे.

लाखावरून हजार हेक्टरवर क्षेत्र, उत्पन्नही झाले कमी

रायगड जिल्ह्यात 1 लाख 24 हजार हेक्टर लागवडीखालील शेती क्षेत्र पूर्वी होते. 2018-19 पर्यंत हे घटून 1 लाख 11 हजार हेक्टर पर्यंत खाली आले होते. गेल्या पाच वर्षांत यात अजून मोठी घट झाल्याचे दिसून येते आहे. यंदा 83 हजार हेक्टर वर भात लागवड करण्यात आलेली होती. यातुन 2081.32 प्रति हेक्टर किग्र उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी पेक्षा यंदा 746 प्रति हेक्टर किग्र उत्पन्न घटले आहे.

क्षेत्र कमी होण्याला पाण्याचाही अभाव

जिल्ह्यात शेतजमिनीपैकी केवळ 7 हजार 165 हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. यातील 2 हजार 988 हेक्टर क्षेत्र हे विहीरींच्या पाण्यावर सिंचित केले जाते. तर 4 हजार 177 हेक्टर क्षेत्र हे इतर धरणे, कालवे आणि इतर साधनांनी सिंचित केले जाते. त्यामुळे बहुतांश शेती ही खरीपाच्या लागवडीवर अवलंबुन आहे. सिंचन सुविधांचा अभाव त्यास कारणीभूत ठरत आहे.

जमिनीला सोन्याचा भाव त्यामुळे शेती विकण्याकडे कल अधिक

शेती व्यवसाय करणे आता जीक्रीचे झाले आहे. शेतात टाकलेला पैसाही निघत नाही. त्यातच नैसर्गिक आपत्ती, अवेळी पाऊस यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात जमीन खरेदी करण्याकडे बाहेरील व्यक्तीचा कल अधिक वाढला आहे. त्यामुळे जमिनीला सोन्याहून अधिक दर मिळू लागला आहे. नवी पिढीही शेती व्यवसायाकडे वळत नाही. त्यामुळे जमीन विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT