रायगड ः अतुल गुळवणी
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपालिकांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवत रायगडातील राजकारण आता चांगलेच तापू लागलेले आहे. विशेष करुन महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच एकमेकांचे मातब्बर नेते,कार्यकर्ते यांना आपापल्या पक्षात घेण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.यावरुन महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागलेले आहे.युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याचा इशाराच राष्ट्रवादी,शिंदे शिवसेनेनेे परस्परांना दिल्याने निवडणुका रंगतदार होणार हे दिसत आहे.
तब्बत चार वर्षानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलेला आहे.त्याचबरोबर या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले प्राबल्या राखण्यासाठी महायुती आणि महाआघाडी यांच्यात चुरस असली तरी खरी लढाई महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे ) आणि राष्ट्रवादी ( अजित पवार) याच तीन पक्षांत निर्माणझालेली आहे.
तिन्ही पक्ष राज्यातील सत्तेत भागीदार असले तरी रायगडावर वर्चस्व मिळविण्यासाठी तिन्ही पक्षांनी यापूर्वीच कंबर कसली आहे.त्यानुसार जिथे जिथे संधी मिळेत तिथे परस्परांचे स्थानिक पातळ्यांवरील मातब्बर नेते फोडून त्यांना आपल्या पक्षांमध्ये घेण्याची जणू स्पर्धाच सुरु झाल्याचे दिसते.गेल्या चार दिवसात तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याचे दिसून आले.
खा. सुनील तटकरे आणि रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्यातील कलगीतुरा जोरात रंगू लागलेला आहे. जिथे जिथे पक्षप्रवेश सोहळे होतात तिथे तिथे दोघेही नेते एकमेकांवर टीका करुन कुरघोडी करताना दिसत आहे.आम्ही युतीधर्माचे पालन करत आहोत,मात्र मित्रपक्षानीही युती धर्माचे पालन करावे,अन्यथा स्वबळावर लढू असा इशाराही तटकरे आणि गोगावले यांनी परस्परांना दिलेला आहे.
गेल्याच आठवड्यात श्रीवर्धन येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना गोगावले यांनी युती झाली तर ठीक नाहीतर आम्ही स्वबळ अजमावू,असा इशाराच तटकरे यांना दिलेला आहे.यामुळे कितीही तडजोडी झाल्यातरी दक्षिण रायगडसह अलिबाग, मुरुड,कर्जत या तालुक्यात महायुतीतीलच मित्रपक्ष परस्परांच्या विरोधातउभे ठाकलेले दिसतील,असा अंदाज आतापासून येऊ लागलेला आहे.
मविआ भांबावलेला
या साऱ्या राजकीय गदारोळात रायगडात महाविकास आघाडी मात्र गोंधळल्या अवस्थेत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.विशेष करुन शेकापमध्ये मोठी अस्वस्थता दिसून येत आहे.पक्षफुटीचा मोठा फटका पक्षाला बसला आहे.त्यातून सावरायचे कसे याचीच चिंता लागलेली आहे.येणाऱ्या निवडणुकांमध्ये अस्तित्वासाठी शेकापला झुंजावे लागणार आहे.अशीच स्थिती ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसची झालेली आहे.या दोन्ही पक्षांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते ढीगभर आहेत.पण त्यांचे नेतृत्व करायला समर्थ नेताच नाही,अशी दयनीय परिस्थिती दोन्ही पक्षांवर आलेली आहे.शरद पवारांची राष्ट्रवादी आता नावापुरतीच जिल्ह्यात राहिलेली आहे.यामुळे या सर्र्वांना महायुतीसमोर लढताना घाम फुटणार हे नक्की.
भाजपचे वेट ॲण्ड वॉच
महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपने रायगडात आता चांगलेच आपले अस्तित्व निर्माण केल्याचे जाणवत आहे.विशेष करुन दक्षिण रायगडची जबाबदारी खा.धैर्यशील पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.त्यांच्या जोडीला माजी आम.पंडित पाटील,माजी जि.प.अध्यक्ष आस्वाद पाटील,चित्रा पाटील यांची टीम कामाला लागलेली आहे.पंडित पाटील यांचे मुरुड,श्रीवर्धनमध्ये चांगले प्राबल्य आहे.
शेकापचे अनेक जुने पदाधिकारी आता पंडित पाटील यांच्यासमवेत दिसू लागलेले आहेत.यामुळे भाजपने आपला विस्तारही वाढविला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी,शिवसेनेच्या कलगीतुऱ्यात न पडता भाजपचे स्वबळावर लक्ष केंद्रीत झाल्याचे दिसून येते.उत्तर रायगडात आम.प्रशांत ठाकूर,महेश बालदी यांचे असणारे वर्चस्व,पेणमध्ये खा.धैर्यशील पाटील,आ.रवीशेठ पाटील यांचे हक्काचे मतदार यांची गोळाबेरीज करत प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांनी आता पक्षाचा चांगलाच जम बसविला आहे.त्यांच्याकडेही पक्षप्रवेश सोहळे होत असले तरी त्यांनी मित्रपक्षातील नेत्यांना न घेता मविआतील असंतुष्ष्टांना जवळ करणे पसंत केलेले आहे.