अलिबाग ः अतुल गुळवणी
रायगडात दहा नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेसह 14 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिकेच्या निवडणुकीबरोबरच जि.प. आणि पं.स.निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे.शिवतीर्थावर सत्ता कुणाची येणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.
नगरपालिकांप्रमाणे राज्यातील जि.प.,पं.सं.वर गेली चार वर्षे प्रशासकीय राजवट लागू होती.आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेर पार पडणार आहेत.त्यातील पहिला टप्पा सध्या नगरपालिकांमध्ये सुरु झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यात जि.प. आणि पं.स. निवडणुका होतील. यासाठी राजकीय पक्षांसाठी नगरपालिकांवर सत्ता मिळविणे महत्वाचे वाटत आहे. याचा परिणाम जि.प.निवडणुकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुतीतही टोकाचा संघर्ष
महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना एकत्र लढतील की नाही याबाबतच उत्सुकता आहे. मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला गेलेला आहे.त्याचे पडसाद सध्या सुरु असलेल्या नगरपालिका निवडणुकांतच उमटताना दिसून येत आहेत.यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यताही दुरापास्त झाल्याचे दिसून येत आहे.
भाजप मात्र दोघांना हवा असला तरी भाजपला मात्र हे मित्रपक्ष डोईजड वाटू लागलेले आहेत.यामुळे स्वबळावर स्थानिक संस्था निवडणुका कशा लढविता येतील याबाबत पक्ष नेतृत्व विचार करत आहे.एकूणच सत्ता मिळवितानाच सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार हे नक्की.
सत्ता राखण्याचे आव्हान
गत निवडणुकीत रायगड जि.प.मध्ये शेकाप 24, राष्ट्रवादी 16,शिवसेना 16,भाजप 3 असे संख्याबळ होते.शेकाप आणि एकत्रित राष्ट्रवादी यांची पाच वर्षे जि.प.वर सत्ता राहिली होती.पण गेल्या चार वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडी,विधानसभा निवडणुकांचे निकाल याचा सारासार विचार केला तर मागील सत्ताध़ाऱ्यांना यावेळी सत्ता मिळेलच असे सांगणे कठीण झालेले आहे.शेकापमध्ये पडलेली फूट, दुसऱ्या फळीतील नेतृत्वाचा अभाव यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी मोठी कसरत शेकाप नेतृत्वाला करावी लागणार आहे.महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह देखील यावेळीउफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.