Which is the most landslide prone area in In Konkan?
रायगड : कोकणातील रायगड जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण असून या सर्व गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रायगडमधील ९ गावे अतिधोकादायक, ११ गावे मध्यम धोकादायक व ८३ गावे सौम्य धोकादायक श्रेणीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील ३६ गावे, तर पालघर जिल्ह्यातील ५४ दरडप्रवण आहेत. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
भूस्खलन का होते?
राज्याच्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या डोंगररांगांमध्ये भूस्खलन होण्याचे प्रमाण जास्त आहे. या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात अधिक पाऊस पडतो. डोंगररांगांमध्ये दगडांची धूप होत असल्यामुळे गाळ तयार होतो. हा गाळ डोंगरउतारावर जमा होत असतो. अतिवृष्टी होते, तेव्हा पाणी मुरल्यामुळे पाण्याचा दाब तयार होतो. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा गाळ अतिरिक्त भार निर्माण करतो. ज्या ठिकाणी हा गाळ बसलेला असतो, तेथे निर्माण होणाऱ्या निसटत्या पृष्ठभागावरून त्याची घसरण्याची प्रक्रिया सुरू होते.
मुंबई शहर विभागात १७ गावे अथवा ठिकाणे दरडप्रवण असून या सर्व गावांचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झाले आहे. ही १७ गावे मध्यम धोकादायक श्रेणीत आहेत. मुंबई उपनगरमध्ये ५७ गावे दरडप्रवण आहेत. या सर्व गावांचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झाले असून यातील ४० गावे अतिसंवेदनशिल श्रेणीत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक दरडप्रवण गावे आहेत. येथे ३०३ गावे दरडप्रवण असून १२२ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील ५ गावे अत्यंत धोकादायक श्रेणीत, ९ गावे मध्यम धोकादायक, ४९ गावे कमी धोकादायक श्रेणीत आहेत. ४१ गावे चौथ्या तर १८ गावे धोकादायकच्या पाचव्या श्रेणीत आहेत. उर्वरित १८१ गावांच्या सर्वेक्षणासाठी ४ ऑगस्ट २०२३ रोजी कळविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ गावे दरडप्रवण आहेत. या गावांच्या सर्वेक्षणासाठी २ ऑगस्ट २०२३ रोजी कळविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. यामुळे किती गावे अत्यंत धोकादायक श्रेणीत आहेत. किती कमी धोकादायक श्रेणीत आहेत हे स्पष्ट झालेले नाही.
रायगड जिल्ह्यात २००५ मध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये २१२ हून अधिक जर्णाचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये तळीये गावावर दरड कोसळली होती. ज्यात ८४ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी इरशाळवाडी येथे दरड कोसळून ८४ जण दगावले होते. कोकणातील इतर जिल्ह्यातही दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
मागील काही वर्षात रायगड जिल्ह्यात भूस्खलनामुळे शेकडो नागरिकांचा बळी गेला असून जिल्ह्यात भूस्खलनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच झालेल्या भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर भूस्खलनाचा धोका असलेल्या आणखी २८९ गावांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये दरडप्रवण गावांची संख्या ३९२ झाली आहे. सध्या मान्सूनच्या पावसाने पंधरा दिवस आधीच वादळी वाऱ्यासह सुरुवात केली असून रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
रायगड जिल्हयाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. महाड, पोलादपूर हे दोन अतिदुर्गम तालुके आहेत. पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. सलग दोन-तीन दिवस होणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरभागांना भेगा पडतात. माती सैल होऊन दरड कोसळण्याची शक्यता निर्माण होते. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील गावांमध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा सरकारच्या संभाव्य धोकादायक यादीत नसलेल्या गावांमध्येही दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
जिल्ह्यात एक-दोन वर्षात दरडी कोसळुन जीवित हानी झाली आहे. त्यामुळे भूवैज्ञानिकांकडून जिल्ह्यातील अनेक गावांचे काटेकोरपणे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्हयात १०३ गावांना दरडींचा धोका होता. तर नुकत्याच झालेल्या भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर भूस्खलनाचा धोका असलेली आणखी २८९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हयात एकूण ३९२ गावांना भूस्खलानाचा धोका असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
भूस्खलनाचा धोका असणाऱ्या गावांची पाच गटात वर्गवारी करण्यात आली आहे. वर्ग एक अर्थात सर्वाधिक धोका असलेली १८ गावे आहेत. त्यात सर्वाधिक महाड आणि पोलादपुरात गावे आहेत. वर्ग दोनमध्ये ७१, वर्ग तीनमध्ये १५९, वर्ग चारमध्ये ४९ आणि वर्ग पाचमध्ये ७३ अशी एकूण ३९२ गावे आहेत. सर्वाधिक गावे पोलादपूर (१४०), महाड (१२१) मध्ये आहेत. फक्त उरण तालुक्यात दरडींचा धोका असलेले एकही गाव नाही, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यात मागील काही वर्षात झालेल्या भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने दरडीच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकार तयारी केलेली दिसते. जिल्ह्यातील वर्ग एक व दोन अशा धोकादायक असणाऱ्या गावांना संपर्कासाठी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली देण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाच वेळी या ठिकाणी हवामान पूर्वसूचना प्रसारित करण्यात येणार आहेत. तसेच आपत्ती काळात थेट संदेश प्रसारित होणार आहे. धोकादायक ठिकाणी सायरनची व्यवस्था करण्यात आलीआहे. या प्रणालीसाठी इन्व्हर्टर बॅटरीही देण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीचा धोका असणाऱ्या गावांना आपत्ती व्यवस्थापन किट पाठवण्यात आले आहेत. किटमध्ये ३० हुन अधिक वस्तू असणारी तरंगणारी प्रथमोपचार पेटी आहे. सीपीआर मास्क, बँडेज, नेक बेल्ट, सेफ्टी गांगल, टॉर्च, शोध व बचाव दिवा, टूल किट, वेगवेगळे दोरखंड, हेल्मेट, ग्लोज, लाइफ जॅकेट, गम बूट, तरंगणारे व फोल्डिंग स्ट्रेचरचा समावेश आहे. तसेच दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या ग्रामस्थांचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात येते. अतिमुसळधार पाऊसाच्या कालावधीत स्थानिक नागरिकांना वेळोवेळी सूचना करण्यात येतात. दरडग्रस्त भागात आवश्यक यंत्र सामुग्री सज्ज ठेवण्यात येते. तात्पूर्त्या निवाऱ्यासाठी इमारती सज्ज ठेवल्या जातात. शिवाय आपत्ती निवारणासंबंधित यंत्रणांनाही सज्ज केले जाते.