TB Free Gram Panchayats Khalapur
अलिबाग : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या 'टीबीमुक्त ग्रामपंचायत' अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालापूर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींचा पंचायत समितीच्या आरोग्य विभागातर्फे गौरव करण्यात आला.
या अभियानात तालुक्यातील ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्षयरोगाबाबत जनजागृती, संशयित रुग्णांचा शोध, वेळेवर निदान आणि उपचार यासाठी प्रभावी कार्य केले. ग्रामपंचायतींच्या या प्रयत्नांमुळे टीबी निर्मूलन मोहिमेला बळ मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले, वैद्यकीय अधिकारी अनिलकुमार शहा, डॉ. प्रसाद रोकडे, डॉ. मानसी कस्तुरे, डॉ. मंगेश देशमुख तसेच आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
गौरव सोहळ्यास पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, उपसभापती भाई शिंदे, गटविकास अधिकारी संदीप कराड, पंचायत समिती सदस्य रितेश जाधव, कमल भस्मा, अर्चना भोईर, गौरी गडगे, प्रमिला पाटील, देवयानी देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, अधिकारी, आशा सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी टीबी निर्मूलनासाठी ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून भविष्यातही जनजागृती आणि आरोग्यविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. तसेच पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती
'टीबीमुक्त ग्रामपंचायत' अभियानांतर्गत माणकिवली, चिलठण, शिरवली, होराळे आणि तुपगाव या ग्रामपंचायतींना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. जांबरुंग, तांबाटी, जांभीवली, गोरठण बु., नारंगी, खारिवली, खानाव, वडवळ आणि वावंढळ या ग्रामपंचायतींना रौप्य पदक, तर होनाड, वासांबे, वावोशी आणि वडगाव या ग्रामपंचायतींना कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले.