अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा गुरुवारी वरसोली येथील सभागृहात पार पडली. हे अभियान यशस्वी करुन रायगडचे नाव राज्यात अग्रेसर राहील असे प्रयत्न करूया, असे आवाहन जि.प. अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी केले.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विशाल तनपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (आरोग्य विभाग) रेश्मा संकपाळ, बहुतांश तालुक्यांचे आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर व उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मार्गदर्शन करताना, रायगड जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात अग्रगण्य राहील यासाठी आपण प्रयत्न करू. प्रत्येक कर्मचारी, अधिकारी यांनी अभियानात हिरीरीने सहभाग घेत हे अभियान यशस्वी करूया, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी, कोविड काळात आरोग्य विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत आपल्याला काम करायचे आहे. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा पुरेपूर असणे गरजेचे आहे. जे अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या अभियानांतर्गत सर्वांनी मनापासून काम केले तर आपल्याच गावचा विकास होणार आहे. यासाठी आपण एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी अभियान राबविण्याबाबत सविस्तर माहिती दिली. संपूर्ण गावाने एकत्र येत आपले गाव आरोग्यसंपन्न करायचे आहे.
यासाठी विविध स्तरावर सर्वसमावेशक कृती दल स्थापन करून जनजागृती, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यशाळेमध्ये अभियानाची माहिती सविस्तर माहिती देण्यात आली. समिती नेमून मार्गदर्शक सूचनांबाबत सांगण्यात आले. त्याचप्रमाणे इतर समस्या, रुग्णालयांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 1 एप्रिलपासून ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राज्यभरात सुरू झाले आहे. मिशन मोडमध्ये आपल्याला हे अभियान राबवायचे आहे. संपूर्ण वर्ष अभियान असल्याने वर्षभरात संपूर्ण गावाने एकत्र येऊन काम करायचे आहे. यासाठी आपण सर्वच प्रयत्न करू.- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी