Raigad Fort Security Pudhari
रायगड

Raigad Fort Security: किल्ले रायगडावरील ५४ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित; काही महिन्यांपासून बंद होती यंत्रणा

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रायगड किल्ला येथील सुरक्षेच्या दृष्टीने एक दिलासादायक घडामोड घडली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ५४ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत.

६ जून रोजी झालेल्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आल्याने शिवभक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रायगडावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

गडावरील काही वादग्रस्त घटनांनंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. छत्रपतींच्या राजधानीतच सुरक्षा यंत्रणा बंद असल्याची बाब अनेक शिवभक्तांच्या मनाला खटकत होती. एप्रिल २०२६ मध्ये या संदर्भातील वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर समाजमाध्यमांपासून विविध स्तरावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी बंद पडलेले कॅमेरे पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक कामे पूर्ण करून गडावरील ५४ कॅमेरे सहा जूनच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून पुन्हा कार्यान्वित केले आहेत

राजसदर, होळीचा माळ, तिकीटघर तसेच गडावरील अन्य महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, गर्दीचे नियोजन करणे तसेच कोणत्याही अनुचित प्रकारांवर वेळीच नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर आणि अन्य दोन ठिकाणी पुरातत्त्व विभागामार्फत बसविण्यात आलेले चार कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे.

हे कॅमेरे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेही पुन्हा कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या २६ व २७ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त गडावर उपस्थित राहणार आहेत.

गडावरील सुरक्षा व्यवस्था सक्षम

रायगड हा केवळ दगड-मातीचा किल्ला नसून तो महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वराज्याच्या वैभवाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींचे जिवंत प्रतीक आहे. त्यामुळे गडावरील सुरक्षा व्यवस्था सक्षम राहणे ही प्रत्येक शिवभक्ताची अपेक्षा असते. या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांनंतर सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाल्याने गडाच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT