रायगड जिल्ह्यात महावितरण कंपनीची वीज देयके वेळेवर भरली जात नाहीत. त्यामुळे वीज बिलाचा बोजा बसतो आहे. Pudhari News Network
रायगड

Raigad Electricity News | रायगडमध्ये वीज ग्राहकांनी थकविले 48 कोटी

जिल्ह्यातील 1 लाख 58 हजार ग्राहकांची देयके भरण्याकडे पाठ; वीज वितरण कंपनीची तारेवरची कसरत

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्यात महावितरण कंपनीची वीज देयके वेळेवर भरली जात नाहीत. त्यामुळे वीज बिलाचा बोजा कायमच बसतो. घरबसल्या वीज बिल भरण्याची सोय असतानादेखील नियमित वीज बिल न भरणार्‍या ग्राहकांमुळे महावितरण कंपनीच्या वीजसेवेवर परिणाम होत आहे. थकीत वीज बिलामुळे महावितरण कंपनीला मोठा आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील 1 लाख 58 हजार 63 ग्राहकांनी 47 कोटी 99 लाख रुपयांचे वीज बिल थकविल्याची माहिती महावितरण कंपनीकडून उपलब्ध झाली आहे. या थकबाकीच्या यादीत जिल्ह्यातील एक हजार 124 कारखान्यांचा समावेश आहे.

पेण येथे महावितरण कंपनीचे जिल्ह्याचे कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत चार विभाग, 17 उपविभाग, 104 सेक्शन आहेत. 1 हजार 200 कर्मचार्‍यांमार्फत सुमारे 6 लाख 58 हजार ग्राहकांना वीजपुरवठा देण्याचे काम महावितरण कंपनी करीत आहेत. अपुरी यंत्रणा असूनदेखील ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न महावितरण कंपनी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

दर महिन्याला वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घरोघरी जाऊन वीज बिल वापराची माहिती घेतात. ती माहिती महावितरण कंपनीकडे पाठवितात. त्यानुसार ग्राहकांना वीज बिल दिले जाते. साधारणतः मोबाईलवर मेसेज तसेच कागदी वीज बिल घरपोचदेखील दिले जात आहे. पूर्वी वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना महावितरण कंपनीच्या कार्यालयावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे प्रचंड गर्दी या कार्यालयासमोर होत असत. ही गर्दी कमी करण्यासाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयांसह काही बँका, पतसंस्थांमध्ये वीज बिल भरण्याची व्यवस्था करण्यात आली.

ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे या केंद्रामध्यदेखील वीज बिल भरण्यास रांगा लागतात. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महावितरण कंपनीने ऑनलाईनचा आधार घेतला. गुगल पे, फोन पे व अन्य ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या वीज बिल भरण्याची सोय करण्यात आली. परंतु, काही ग्राहकांकडून वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महावितरण कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. कोट्यवधी रुपयांचे वीज बिल थकल्याने ते वसूल करताना कंपनीला तारेवरची कसरत करावी लागत आहे. वीज बिल भरण्यासाठी आधुनिक पद्धत सुरु केली असतानाही वीज बिल थकीतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वीज बिल थकीतदारांमुळे वीजसेवेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. वेळेवर वीज बिल न भरल्याने विद्युत कनेक्शन तोडण्याची वेळ महावितरण कंपनीवर आली आहे. अनेकवेळा ग्राहकांच्या घरी जाऊन वीज बिल भरण्याचे आवाहनही केले जात आहे. काही वेळा वीज बिल भरण्यावरून कर्मचारी आणि ग्राहक यांच्यामध्ये वादही होतात. यातून गुन्हे दाखल होत आहेत. वीज वितरण कंपनीमध्ये आता ऑनलाईन वीज देयक भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. तरी ग्राहकांची वेळेत देयक भरण्याची मानसिकता अद्याप निर्माण झालेली नाही.

वीज बिल नियमित वेळेत भरले जात नाही. त्याचा परिणाम सेवेवर होत आहे. ग्राहकांनी तातडीने बिल भरावे. थकीत बिल ग्राहकांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली असून, नागरिकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे.
धनराज बक्कड, अधीक्षक अभियंता, पेण, रायगड.

थकबाकीदारांमध्ये 1124 कारखाने

रायगड जिल्ह्यातील 1 लाख 58 हजार 63 ग्राहकांनी वीज बिल थकविले आहे. 47 कोटी 99 लाख 11 हजार रुपयांची थकीत रक्कम आहे. ही रक्कम वसूल करताना कर्मचार्‍यांची दमछाक होत आहे. या थकीतमध्ये रायगड जिल्ह्यातील 15 हजार 649 व्यावसायिक आणि एक हजार 124 कारखान्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT