पोलादपूर : तालुक्यातील बोरज फाटा–साखर मार्गावरील ढवळी जुन्या पुलाचा कठडा कोसळल्याची गंभीर घटना घडली असून, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. पुलाचा एक बाजूचा संरक्षण कठडा कोसळल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.रविवारी दिवसभरात 265 मी मी पाऊस झाल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
रायगड जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्यात जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. अनेक नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत ढवळी पुलावरील कठडा कोसळल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या अंधारात किंवा मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्यास वाहनचालकांना पुलाच्या कडेला असलेला धोका लक्षात येणे कठीण होऊ बसले असल्याने या ठिकाणी प्रतिबंधक करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ कडून करण्यात यावे
हा मार्ग बोरज फाटा, साखर, ढवळी तसेच परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे. दररोज शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, दुचाकीस्वार, चारचाकी वाहने तसेच मालवाहतूक करणारी हलकी वाहने या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे पुलावरील कठडा कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पुलाभोवती बॅरिकेड्स उभारावेत, धोक्याचे फलक लावावेत आणि आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पुलाची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे पुलाखालील पाण्याचा वेग वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास टाळावा, अत्यावश्यक असल्यास अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे आणि वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन पुलाची संरचनात्मक तपासणी करावी, आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.