TB Cases  Pudhari Photo
रायगड

Raigad TB Patients | रायगड क्षयमुक्तीपासून दूर: जिल्ह्यात एकूण २ हजार ५४९ क्षयरुग्ण

जानेवारी ते मार्च तीन महिन्यांत ८७९ नवे रुग्ण आढळले

पुढारी वृत्तसेवा

Tuberculosis cases in Raigad district

अलिबाग : रायगड जिल्ह्यात क्षयरोग (टीबी) निर्मूलनाच्या प्रयत्नांना अद्याप अपेक्षित यश मिळालेले नसून जिल्हा क्षयमुक्तीपासून दूर असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ५४९ क्षयरुग्णांवर उपचार सुरु असून, यापैकी ८७९ क्षयरुग्ण हे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत क्षयरुग्ण शोध मोहिमेला वेग देण्यात आला आहे. त्यातून नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच दुर्गम भागात अद्यापही क्षयरोगाबाबत जागरूकतेचा अभाव असल्याचे दिसून येते.

मागील तीन महिन्यात ८७९ क्षयरुग्ण सापडल्याने संसर्गाचा वेग अद्याप कमी झालेला नसल्याचे स्पष्ट होते. काही रुग्णांकडून उपचार अपूर्ण ठेवले जाणे, वेळेवर तपासणी न होणे आणि सामाजिक भीती यामुळेही परिस्थिती गंभीर बनत आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजन घटणे किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी. क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा असून, नियमित आणि पूर्ण उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

क्षयरोग मुक्तीसाठी जिल्ह्यात १०० दिवसांचे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी करणे तसेच सापडलेल्या

रुग्णाने औषधोपचार अर्धवट सोडू नये याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करणे व आवश्यक दुर्गम भागात तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील २ हजार ५४९ क्ष्यरुग्णानावर उपचार सुरू असून, हे क्षयरुग्ण जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींपैकी ३६५ ग्राकपंचायतींमध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२३ पासून क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे. मात्र तीन वर्षांनंतरही जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या नसल्याचे आरोग्य विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील ४४५ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्या.
- डाॅ. प्राची नेहुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT