अलिबाग : सुवर्णा दिवेकर
पेण आरटीओ विभागाच्या हद्दीत सुमारे अडीच लाख वाहने एचएसआरपी नंबर प्लेट शिवाय आहेत. वारंवार मुदतवाढ देऊनही ज्या वाहनांना 'एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) बसवण्यात आलेल्या नाहीत अशा जिल्ह्यातील वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पेण प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली.
'एचएसआरपी' नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईसह अन्य निर्बंध लावण्यात आले आहेत. पेण प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ३ लाख ८३ हजार वाहनांना 'एचएसआरपी' नंबर प्लेट बदलण्याची मोहीम दीड वर्षापूर्वी सुरु करण्यात आली. अद्याप सुमारे अडीच लाख वाहनांना शिल्लक एचएसआरपी' नंबरप्लेट बसविणे बाकी आहे. परंतु अनेक वाहनांवर जुन्याच नंबर प्लेट दिसत आहेत.
नंबर प्लेट बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. शासनाने एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली. असे असताना १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या ३ लाख ८३ हजार पैकी केवळ ५४ टक्के वाहनांवर ही नंबरप्लेट बसवण्यात आली. नागरिकांचा या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे शासनाने आता दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच एचएसआरपी नसलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत. यामध्ये वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उत्तरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही.
नंबर प्लेट बसवावी लागणारी वाहने - ३ लाख ८३ हजार
नंबर प्लेटसाठी दाखल अर्ज - १ लाख २१ हजार
बसवण्यात आलेल्या नंबर प्लेट- १ लाख १८ हजार
शिल्लक नंबरप्लेट - २ लाख ६५ हजार
नव्या नंबर प्लेटसाठी नोंदणी व ती नंबर प्लेट तयार करुन घेण्यासाठी रायगड जिल्ह्यात ७ केंद्र सुरु करण्यात आली होती. केंद्रे कमी व वाहनांची संख्या जास्त असल्याने नोंदणी करुनही नंबर प्लेट मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील वाहनचालकांच्या आहेत. केंद्रांवर रांगा लागत असल्या तरी या वाहनधारकांना नंबर प्लेटसाठी प्रतिक्षा करीवा लागत आहे; परंतु नंबर प्लेट बदलण्यास नेमलेल्या केंद्रांचा कारभार सुधारण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. वाहन धारकांनी वेळेत नंबर प्लेट बदलण्याचे आवाहन केले जात आहे. गर्दी झाल्यास योग्य उपाययोजना सूचना करण्यात आल्या आहेत. कारवाई टाळण्यासाठी नंबरप्लेटसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे, असे आवाहन पेण प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे.
सुरक्षित नंबर प्लेट बसवण्यासाठी असलेल्या केंद्रांवर नेहमीच गर्दी असते. त्यामुळे वारंवार मागणी करुनही या केंद्राची संख्या वाढवण्यात आलेली नाही. जुन्या वाहनांसाठी फक्त नंबर प्लेट बदलण्याकरीता इतके दिवस फेऱ्या मारुनही नंबरप्लेट वेळेत मिळालेली नाही. हेलमेट, पियुसी, हेडलाईट, सीटबेल्टप्रमाणेच नंबरप्लेट हा एकप्रकारे चालकांना वेठीस धरण्याचा कारण ठरणार आहे.संदीप पाटील, वाहनचालक