पनवेल : विक्रम बाबर
पनवेल तालुक्यात अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) दबदबा कायम राहिला होता. पंचायत समितीपासून जिल्हा परिषद स्तरापर्यंत लाल बावट्याचे वर्चस्व इतके मजबूत होते की, या भागात पर्याय म्हणून दुसऱ्या पक्षाचा विचारही फारसा केला जात नव्हता. मात्र गेल्या दशकभरात बदललेले राजकीय समीकरण आणि भाजपने राबवलेली नियोजनबद्ध रणनीती यामुळे अखेर शेकापच्या बालेकिल्ल्यावर कमळ फुलल्याचे चित्र दिसू लागले आहे. 2017 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपची चढाई 2026 च्या निवडणुकीत निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
2017 मधील निवडणूक भाजपसाठी टर्निंग पॉइंट ठरली. त्या निवडणुकीत नेरे आणि पाली देवद या जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपने मिळवलेले यश ग्रामीण भागातील मतदारांमध्ये पक्षासाठी विश्वास निर्माण करणारे ठरले. यापूर्वी ग्रामीण मतदार शेकापशी निष्ठावंत असल्याचे चित्र होते. मात्र भाजपने स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत विकासाचे मुद्दे पुढे केल्यामुळे मतदारांमध्ये पर्याय निर्माण झाला.
पंचायत समिती स्तरावरही काही गणांमध्ये मिळालेल्या यशामुळे भाजपला संघटन विस्ताराची मोठी संधी मिळाली. याच कालावधीत भाजपने गावपातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला.
या पायाभूत तयारीचा प्रभाव 2026 च्या निवडणुकीत स्पष्ट दिसून आला. भाजपने यावेळी अत्यंत आक्रमक आणि सूक्ष्म नियोजनबद्ध रणनीती अवलंबली. प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी स्वतंत्र रणनीती आखण्यात आली.
स्थानिक नाराजी दूर करणे, समाजातील विविध घटकांमध्ये समतोल राखणे आणि स्थानिक नेतृत्वामध्ये समन्वय साधणे या बाबींवर पक्षाने विशेष भर दिला. प्रचार मोहिमेदरम्यान मतदारांशी थेट संवाद साधण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागात भाजपचा प्रभाव अधिक वाढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे वावंजे आणि पळस्पे हे गट भाजपसाठी पारंपरिकदृष्ट्या कठीण मानले जात होते.
या भागात शेकापची पकड मजबूत होती. मात्र संघटनात्मक मजबुती आणि स्थानिक नेतृत्वाला दिलेले प्रोत्साहन यामुळे भाजपने या गटांमध्येही विजय मिळवत विरोधकांच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का दिला. त्याचबरोबर पाली देवद आणि नेरे या गटांमध्ये सलग विजय मिळवत भाजपने आपली ताकद अधिक भक्कम केल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषद गटांमध्येही भाजपच्या उमेदवारांनी दमदार कामगिरी करत विजय संपादन केला. गव्हाण जिल्हा परिषद गटातून निकिता निलेश खारकर, वावंजे गटातून कमला एकनाथ देशेकर, नेरे गटातून आत्माराम बाळू भस्मा, पाली देवद गटातून प्राची अमित जाधव, पळस्पे गटातून हर्षदा अतुल घरत, वावेघर गटातून अनन्या अविनाश गाताडे, वडघर गटातून सोनाली अनुज जितेकर आणि केळवणे गटातून मंगेश रामचंद्र वाकडीकर यांनी विजय मिळवत भाजपचे वर्चस्व वाढवले.
पंचायत समिती गणांमध्येही भाजपने आघाडी कायम ठेवली. गव्हाण गणातून जिज्ञासा किशोर कोळी, वहाळ गणातून वितेश त्रिंबक म्हात्रे, वावंजे गणातून आरती कुणाल काठे, चिंध्रण गणातून अंकुश बाळाराम खैर, नेरे गणातून वर्षा सचिन केवारे, आदई गणातून भूपेंद्र सदानंद पाटील, पाली देवद गणातून वैशाली प्रविण सावंत, विचुंबे गणातून नीलम प्रमोद भिंगारकर, पळस्पे गणातून राजेंद्र हरिचंद्र पाटील, कोन गणातून योगिता योगेश लहाने, वावेघर गणातून राजू गणा पाटील, पोयंजे गणातून अस्मिता अनंता पाटील, करंजाडे गणातून रंजना सदाशिव वास्कर, वडघर गणातून मनीषा गजानन पाटील आणि आपटा गणातून मयूर परशुराम शेलार यांनी दणदणीत विजय मिळवला.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती स्तरावर मिळालेल्या यशामुळे भाजपच्या राजकीय वाढीचा आलेख अधिक ठळक झाला. वावंजे, चिप्रन, नेरे, आदई, पाली देवद, विचुंबे, पळस्पे आणि कोन या आठही गणांमध्ये भाजपने विजय मिळवत पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली. अनेक वर्षे शेकापच्या ताब्यात असलेल्या या संस्थेवर कमळ फुलल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले.