

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेल्या 27 आरोपींविरोधात अखेर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मोक्का न्यायालयाने आरोप निश्चिती केली. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी निश्चित केलेले आरोप फेटाळून लावत निर्दोष असल्याचा दावा सर्व आरोपींनी केला. आता 24 फेब्रुवारीपासून खटला सुरू होईल.
बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर 2024 च्या रात्री वांद्रे येथील त्यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या हायप्रोफाईल हत्या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी विशेष गती दिली आणि आरोपींना अटक केली.
या प्रकरणात कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईने आपल्या संघटित गन्हेगारीद्वारे मुंबईत दहशतीचं वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानेच बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) जानेवारी 2025 मध्ये 4590 पानांचे पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात मुंबई पोलिसांनी एकूण 26 आरोपींचा समावेश केला होता तर तिघांना फरार घोषित केले होते. त्यात अनमोल बिष्णोईचाही समावेश होता. मुंबई पोलिसांनी यात 210 जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत.
सरकारी पक्षाचा दावा
अनमोल बिश्नोईने आपल्या गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांसह, दहशतवाद आणि वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यामुळेच त्यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या आरोपपत्रात एकूण 29 आरोपींचा समावेश आहे. त्यापैकी 27 आरोपींना अटक करण्यात आली असून तुरुंगात असलेल्या गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यासह शुभम लोणकर या दोन फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.