पाली :शरद निकुंभ
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील वाहतूक कोंडी ही आता प्रशासनाची अकार्यक्षमता आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियता बनली आहे. शहराच्या कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून जाहीर झालेला बाह्यवळण मार्ग मंजूर होऊन 15 वर्षे उलटली, तरीही प्रत्यक्षात एक इंचही काम न होणे हे लोकप्रतिनिधींच्या केवळ घोषणाबाजीचे विदारक चित्र आहे. भाविक रस्त्यावर अडकलेले असताना सत्ताधारी मात्र आश्वासनांच्या पलीकडे जायला तयार नाहीत.
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) ला पालीपाटणूस मार्गाशी जोडणारा हा बायपास बलाप गावावरून थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागील झाप गावापर्यंत जाणार आहे. 18 कोटी रुपयांचा रस्ता आणि 10 कोटींचे भूसंपादन मंजूर असतानाही हा प्रकल्प अजूनही फाइलच्या ढिगाऱ्यात अडकून आहे. तांत्रिक अडचणींची कारणे पुढे करून आणि शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून लोकप्रतिनिधींनी हात झटकले आहेत, अशी तीव्र भावना नागरिकांत आहे.
पाली हे तालुक्याचे ठिकाण आणि अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. बल्लाळेश्वर मंदिर परिसर, गांधी चौक, जुने एस.टी. स्टँड, बाजारपेठ आणि शाळा परिसर हे भाग कायम वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. अरुंद रस्त्यांवरून अवजड वाहने कोंडीतून काढताना अपघातांचे प्रमाण वाढत असून, त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे आणि संथगतीमुळे मुंबई, पुणे आणि कोकण दरम्यानची मोठ्या प्रमाणातील वाहतूक पालीमार्गे वळवली जाते. त्यामुळे तीर्थक्षेत्रातील स्थानिक वाहतुकीवर बाहेरच्या वाहनांचा ताण पडतो. मात्र हे वास्तव माहीत असूनही लोकप्रतिनिधींकडून ठोस पावले उचलली जात नाहीत.
शहरातील वाढती अतिक्रमणे, दुतर्फा पार्किंग, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन आणि पोलिस व नगरपंचायतीकडून होत असलेली ढिसाळ कारवाई यामुळे पालीकरांचा संताप उफाळून येत आहे. रस्ते मोकळे करण्याची हिंमत आणि बायपास मार्ग प्रत्यक्षात आणण्याची इच्छाशक्ती लोकप्रतिनिधी कधी दाखवणार? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
शहरातील या स्थितीबाबत सामान्य नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. अतिक्रमणांवर कारवाई, शिस्तबद्ध पार्किंग आणि वाहतूक नियोजन तातडीने व्हावे, अशी आमची मागणी आहे. बायपासचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला असला, तरी किमान शहरातील रस्ते तरी मोकळे ठेवावेत,’ अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नगरपंचायतीने प्रत्यक्ष कृतीतून दिलासा दिल्यासच पालीकरांचा विश्वास पुन्हा दृढ होईल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
बायपास प्रत्यक्षात आला तर अवजड वाहने शहराबाहेरून जातील आणि पालीला दिलासा मिळेल. मात्र बायपास कागदावरच आणि रस्ते अतिक्रमणातच ठेवून लोकप्रतिनिधी किती काळ पालीकरांच्या संयमाची परीक्षा पाहणार, हा प्रश्न आता अधिकच तीव्र होत चालला आहे.