कर्जत : कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी आवश्यक असलेला रस्ता बनवण्याची तयारी सुरू केली आहे. शासनाने रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, मात्र त्या जमिनी देण्यास आणि आता जमिनीमध्ये लावण्यात आलेली भाताची शेती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
दरम्यान शासनाने जमिनीचे भाव निश्चित केले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आणि आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे. पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीत जलविद्युत प्रकल्प टोरंट वीज कंपनी उभारत आहे. टोरेंट पॉवर कंपनी आणि शासनामार्फत सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांनी एकजुटीचा पवित्रा घेतला आहे.
भालीवडी, आंबोट, पोटल, पाली आणि हुमगाव या गावांमधील जमिनी या भूसंपादनात समाविष्ट आहेत. या सर्व शेतकरी बांधवांना सर्वसामान्य असलेले शेतकरी मंगेश म्हसे यांनी आवाहन केले आहे. पाली ग्रामस्थांनी आपल्या जमिनी टोरंट प्रकल्पासाठी दिल्या जाणार नाही, अशी भूमिका घेतली असून हा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या मुख्य बांधाजवळ असलेल्या मोहमाळवाडी आणि आंबे-वाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी देखील धरणाच्या हालचाली सुरू झाल्यापासून विरोध कायम ठेवला आहे. धरणाच्या मुख्य बांधाजवळ जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता बनवण्यासाठी शासनाने अधिसूचना जारी केली आहे.
बहुसंख्य शेतकऱ्यांकडून हरकती..
सध्या भालिवडी येथून पाली गाव आणि पुढे आंबेवाडी पर्यंत रस्ता तयार आहे. असे असताना स्वतंत्र रस्ता तयार करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना लक्षात घेता शेतकरी जमिनी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता शेतक-यांनी जमीन द्यायची नाही यासाठी हरकती नोंदवण्यास सुरुवात केली आहे.