Nhava Sheva Container Pudhari
रायगड

Nhava Sheva Container: 'जेएनपीए'तील निर्यातीला वाहतूककोंडीचा फटका; द्राक्ष-केळी निर्यातीवर गंभीर परिणाम

वाहतूक कोंडीमुळे 48 तासांची मर्यादा ओलांडली; निर्यातदारांची प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

उरण : राजकुमार भगत

नवी मुंबईतील न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदर परिसरात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे उत्तर महाराष्ट्रातील कृषी निर्यातीचे कंबरडे मोडले आहे. गेट वे टर्मिनल आणि भारत मुंबई कंटेनर टर्मिनलच्या प्रवेशद्वारांवर तासन्‌‍तास लागणाऱ्या रांगांमुळे द्राक्षे, कांदा आणि केळी यांसारखा नाशवंत माल वेळेत जहाजापर्यंत पोहोचू शकत नाहीये. याचा थेट परिणाम भारताच्या जागतिक प्रतिमेवर होत असल्याची ओरड निर्यातदारांनी केली आहे.

हॉर्टिकल्चर उत्पादन निर्यातदार संघटनेने सीमा शुल्क विभागाकडे मांडलेल्या तक्रारीनुसार, परिस्थिती गंभीर आहे. टोल प्लाझा आणि बाहेरील रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोल प्लाझावर 8 पैकी काहीच प्रवेशद्वारे सुरू असतात, ज्यामुळे वाहनांचा खोळंबा होतो. वातानुकूलित कंटेनरला पार्किंग प्लाझामधून बाहेर पडायला 24 तास आणि टर्मिनलपर्यंत पोहोचायला आणखी 12 ते 24 तास लागतात. 48 तासांची निर्यातीची वेळ मर्यादा ओलांडली जात असल्याने माल जहाजावर चढवता येत नाही.

बंदरात दररोज 8 ते 9 जहाजे येत असल्याने वातानुकूलित कंटेनर्ससाठी आवश्यक असलेल्या प्लग पॉइंट्सची कमतरता भासत आहे. वीज नसल्यास आणि वेळेत माल न चढवल्यास नाशवंत माल खराब होण्याची भीती असते. यामुळे निर्यातदारांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंड आणि नुकसान सोसावे लागत आहे.

संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सीमा शुल्क आयुक्त संजय पै यांची भेट घेऊन नाशवंत मालाच्या कंटेनर्ससाठी स्वतंत्र आणि जलद मार्ग उपलब्ध करावा. जहाजांच्या गर्दीच्या वेळी पार्किंग प्लाझाची सर्व प्रवेशद्वारे खुली ठेवावीत. रस्ते प्राधिकरणाशी बोलून रस्त्यांची कामे जलद गतीने पूर्ण करावीत. बंदरात वातानुकूलित कंटेनर्ससाठी विजेची अधिक सोय करावी या मागण्या मांडल्या आहेत.

‌‘वाहतूक कोंडीमुळे परदेशी खरेदीदारांना दिलेली आश्वासने पाळणे कठीण होत आहे. यामुळे जागतिक बाजारात भारतीय निर्यातदारांची पत घसरत आहे. प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे असेे हॉर्टिकल्चर उत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले.

सीमा शुल्क विभागाचे आयुक्त संजय पै यांनी या समस्यांची दखल घेतली असून, वातानुकूलित कंटेनर्सच्या निर्यातीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

बंदरात दररोज 8 ते 9 जहाजे येत असल्याने वातानुकूलित कंटेनर्ससाठी आवश्यक असलेल्या प्लग पॉइंट्सची कमतरता भासत आहे. वीज नसल्यास आणि वेळत माल न चढवल्यास नाशवंत माल खराब होण्याची भीती असते. यामुळे निर्यातदारांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंड आणि नुकसान सोसावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT