Neral Dahivali bridge damage pudhari photo
रायगड

Raigad News : नेरळ-दहिवली पुलाची दुरवस्‍था; दुरुस्तीची मागणी

तहसीलदारांना निवेदन; अपघात घडून जिवितहानी झाली तर जबाबदार कोण? नागरिकांकडून प्रश्न उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : नेरळ-दहिवली पुलाला अलीकडील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेरळ उपशहर प्रमुख तथा राजेंद्रगुरुनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष संदीप नारायण उतेकर यांनी १३ जुलै २०२६ रोजी कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना निवेदन सादर करून पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ-दहिवली पुलाच्या दोन्ही बाजूंचे काठ खचले असून संरक्षणासाठी उभारण्यात आलेले लोखंडी रॉड उखडले आहेत. पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

संदीप उतेकर यांनी प्रशासनाला इशारा देत पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असून, महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेप्रमाणे एखादी घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

पावसाचा जोर कमी झाल्याने संबंधित विभागाला तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करून पूल सुरक्षित व वाहतुकीयोग्य करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनासोबत पुलाच्या सद्यस्थितीची छायाचित्रे जोडण्यात आली असून, प्रशासनाने प्राधान्याने सकारात्मक निर्णय घेऊन दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पुलाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, पुढे एखादा अपघात घडून जिवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची-शासन, संबंधित विभाग की लोकप्रतिनिधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

नेरळ-दहिवली पुलाची झालेली दुरवस्था आणि यासंदर्भात कर्जत तालुका मनसेच्या वतीने यापूर्वीच संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींना देण्यात आलेला इशारा लक्षात घेता, या धोकादायक पुलावरून दररोज प्रवास करणारे वाहनचालक, शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या पुलावर पुढे एखादा अपघात होऊन जिवितहानी झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच संबंधित विभागातील जबाबदार अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येईल. कायदा सुव्यवस्था बिघडली तर संपूर्ण जबाबदारी ही शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची असेल.
यशवंत भवारे, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), कर्जत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT