खोपोली ः प्रशांत गोपाळे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर झालेलल्या टँकर दुर्घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.आपत्कालीन दुर्घटनेच्यावेळी टोल देऊनही द्रुतगती मार्गावरील यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे.याचा मोठा त्रास खोपोलीकरांनाही सहन करावा लागला.
घटनास्थळी एनडीआरएफ, पोलिस अधिकारी, महामार्ग पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, क्रेन, बीपीसीएल व रिलायन्सचे रासायनिक तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांची मोठी हेल्प फाऊंडेशन यंत्रणा तैनात होती.मात्र आवश्यक तज्ज्ञ पथकांची उणीव भासली. द्रुतगती मार्गावर दररोज घातक रसायने व गॅस वाहतूक करणारे शेकडो टँकर धावतात; मात्र अशा वाहनांच्या चालकांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही.
गॅस गळती रोखण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ पथकाची उणीवही या घटनेत प्रकर्षाने जाणवली. सर्वाधिक अपघात होणाऱ्या आडोशी पट्टयात भविष्यात अशा घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक प्रभावी व्यवस्था उभी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
रसायने आणि ज्वलनशील वायूंची वाहतूक करतांना काही नियम अथवा एसओपी घालून दिलेल्या असतात. ते पाळले जात नाहीत. खरेतर ज्वलनशील पदार्थ अथवा वायू वाहतुक करतांना परदेशात टँकरच्या मागे पायलट आणि तज्ञ पथक असणे आवश्यक असते.
या एक्स्प्रेसवर अशी खबरदारी कुठेच घेतली जात नाही. त्यामुळे जेव्हा असे अपघात होतात. संपूर्ण यंत्रण वेठीस धरली जाते. प्रोपोलीन सारख्या घातक वायूंच्या वाहतुकीसाठी एसओपीचे काटेकोर पालन व्हायला हवे.
यंत्रणा वेठीस धरण्याचा प्रकार
एक्सप्रेस वे वर अशी खबरदारी कुठेच घेतली जात नाही. त्यामुळे जेव्हा असे अपघात होतात. संपूर्ण यंत्रण वेठीस धरली जाते. त्यामुळे प्रोपोलीन सारख्या घातक वायूंच्या वाहतुकीसाठी एसओपीचे काटेकोर पालन व्हायला हवे, तरच अशा दुर्घटना टाळता येऊ शकतील आणि दर्घटना झालीच तर तात्काळ उपाययोजना करता येतील असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
दोन तपानंतरही समस्या
दररोज टोलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होणाऱ्या मार्गावर अपघात व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा पुरेशी सक्षम आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात येऊन 26 वर्षे झाली असून, बोरघाट उतरून मुंबईकडे येणारा आडोशी परिसर मृत्यूचा पट्टा म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी टँकरचालकाच्या निष्काळजी पणामुळे हा अपघात घडला. घाटाचा भाग उतरताना ब्रेक न लागणे व वाहन अनियंत्रित होऊन अपघात होण्याचे प्रकार वारंवार घडतात.