खोपोली: स्वातंत्र्यानंतरही ना रस्ता,ना पाणी,ना वीज..अशा दुर्गम भागात राहणाऱ्या माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या उंबरणेवाडी, पिरकडवाडी, आरकसवाडीतील ग्रामस्थांचे डोळे मनिषा पारधीच्या घटनेने उघडले असून,शासनाच्या अनास्थेविरोधात आवाज उठवत या ग्रामस्थांनी श्रमदानाद्वारे गावासाठी रस्ता तयार करण्याचा संकल्प केला आहे.रविवारी भर पावसात हातात फावडे घेत तात्पुरता स्वरुपाचा रस्ता तयार केला आहे.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या उंबरणेवाडीतील महिला मनिषा पारधीच्या प्रसुतीची घटनाच ग्रामस्थांना प्रोत्साहित करुन गेली. नुकताच उंबरणेवाडीतील गरोदर महिलेला उपचारासाठी चौक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कापडाच्या झोळीतून चार ते पाच किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करत नेण्यात आले.
त्यानंतर या महिलेने गोंडस बालकाला जन्म दिला असता तिच्यावर चार दिवस उपचार केल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे यानंतर मनिषा पारधी आपल्या नवजात बाळासह उपचारानंतर पुन्हा गावाकडे परतली; मात्र गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने तिला आणि बाळाला कापडाच्या झोळीतून नेण्यात आल्याने येथील भयानक वास्तव्य जगासमोर आले.
रोजीरोटी कमावण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी डोंगरदऱ्यातून जीवावर उदार होऊन दोन अडीच तासाचा प्रवास करावा लागत आहे. असे असतानाही या समस्येकडे अद्याप पर्यंत सरकारने व लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने ग्रामस्थ स्वातंत्र्यानंतर मरण यातना भोगत आहेत.
रविवारी शासनाच्या मदतीची वाट न पाहता जवळपास ५० ते ६० ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान करत दगड गोट्याच्या मदतीने हातात फावडा घेत तात्पुरता स्वरूपाचा रस्ता बनवला आहे.
आम्ही उंबरणेवाडी, आरकसवाडी, पीरकडवाडी या तिन्ही गावचे ग्रामस्थ मिळून गावात येण्या - जाण्याचा तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करत आहोत. शासन आमच्याकडे लक्ष देत नसून खासदार - आमदार - तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली, परंतु यावर काही तोडगा निघत नाही. त्यामुळे आम्ही तिन्ही गावामधील ग्रामस्थ मिळून एखादी बाईक जाण्याच्या अनुषंगाने हा रस्ता बनवत आहोत.- बबन वीर, ग्रामस्थ