खोपोली : प्रशांत गोपाळे
खालापूर तालुक्यातील माथेरानच्या कुशीत वसलेल्या उंबरणेवाडी, पिरकडवाडी, आरकसवाडी या तीन वाड्यांच्या मरणयातना संपता संपेनात. नागरी सुविधांपासून येथील नागरिक वंचित आहेत. मात्र रोजीरोटी कमावण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी डोंगरदऱ्यातून जीवावर उदार होऊन दोन अडीच तासाचा प्रवास करावा लागत आहे. येथील ग्रामस्थ स्वातंत्र्यानंतर मरण यातना भोगत असून आपल्या गावाकडे जाण्यासाठी चक्क शिडीचा वापर करावा लागत आहे.
लोधीवली ग्रामपंचायतमधील उंबरणेवाडी, पिरकडवाडी, आरकसवाडी या आदिवासी ठाकूरवाडी गावांकडे जाताना येथील ग्रामस्थांना दगडधोंड, नदी , नाले व दऱ्याखोऱ्यातून जावे लागत आहे.
या गावांकडे जाताना दोन ठिकाणे अशी आहेत की, डोंगरावरून दगड कधीही घसरून अंगावर कोसळून जीवावर बेतू शकतं.तर दुसरे ठिकाण आहे, शिडी घाट. या घाटात डोंगरमाथ्यावर पडलेले पाणी या शिडीवर पडतं. काही ठिकाणी या घाटातील दगड खिळखिळे झाले आहेत. त्यातील दगड निसटला तर अखेरचं हे राम म्हणावं लागेल. रोज या मार्गावरून घाटातून पन्नासहून अधिक तरुण रोजीरोटी कमावण्यासाठी माथेरान कडे जातं असतात. असे असतानाही याकडे कोणाचे लक्ष नसल्याने ग्रामस्थ जीव मुठीत धरून ये जा करीत आहेत.
उंबरणेवाडी, पिरकडवाडी, आरकसवाडी येथील ग्रामस्थ स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात जगत असून या ठिकाणी अद्याप लाईट नाही, पाणी नाही व प्रामुख्याने रस्ता नाही. सरकार एकीकडे विकासाचा गाजावाजा करत असताना या गावातील ग्रामस्थांनी विकासाच्या काळात विकासाच पाहिला नाही. या ठिकाणी निवडणुकीच्या काळात नेतेमंडळी येतात विकासाच्या गप्पा मारून जातात व पुन्हा ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या नशिबी फक्त समस्या आणि समस्या आणि विकासाचा अंधार पाहायला मिळतोय.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सकाळी ६ वाजता घरातून कामाला निघतात माथेरानला दोन ते अडीच तासाने पायपीट करीत पोहचतात. त्यानंतर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .मात्र स्थानिक आमदार - ग्रामपंचायत लक्ष देत नाही. तर त्यांची पाच मिनट लाईट नसल तर तुम्हाला कस होत. एवढ्या जंगलात आम्ही अंधारात कसे राहत असू. याचा विचार राज्य सरकारने कारवा असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे
ना रस्ता, ना वीज, ना पाणी
दोन दिवसापूर्वी माझी बहीण मनीषा पारधी हिला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली, तिला उपचारासाठी झोळीतून नेले. आमच्या इथे रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही, आमच उपजिविकेच ठिकाण माथेरान आहे. तिथे जाण्यासाठी वाट इतकी खडतर आहे की, सांगू शकत नाही. एकदा दगड जरी खाली आला तर जीव जाऊ शकतो. तर आमच्या इथली समस्या लक्षात घेऊन स्थानिक आमदार महेश बालदी गावात आलेले आणि देवीची शप्पथ घेतली. मी तुम्हाला लाईट, रस्ता, पाणी देईल, पण अजून काहीच दिला नाही,अशी तक्रार ग्रामस्थ बबन वीर यांनी केलेली आहे.
रोजगारासाठी माथेरानला दोन तास पायी प्रवास करत रोजी रोटीसाठी कामाला जातो. शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलाय. लाईट नाही - पाणी नाही तर महिलांसाठी शौचालय नाही.योगेश पारधी, ग्रामस्थ