माथेरान : मिलिंद कदम
गाव तेथे रस्ता ही केंद्र सरकारची योजना असताना माथेरान सारख्या पर्यटन स्थळावर फक्त एक मात्र रस्ता असणे हे या पर्यटन स्थळा करिता शाप ठरत असून आपत्कालीन वेळी माथेरानकरीता पर्यायी रस्ता हवा ही मागणी माथेरानकर अनेक वर्षांपासून करीत आहेत. त्यास काही प्रमाणात यश आले होते. पनवेल ते माथेरान रस्त्याचे भूमिपूजन 1962 साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. त्यातील तीन टप्प्यांपर्यंतचे कामे पूर्ण झालेले आहे. तरीही हा रस्ता पूर्ण असल्याने प्रशासन या रस्त्याकरिता उदासीन आहे का असा प्रश्न माथेरानकर विचारत आहेत.
एम एम आर डी ए मार्फत पनवेल व तिसरी मुंबई याकरिता मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असताना पनवेलपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये मानाचे स्थान पनवेलला असणार आहे कारण या ठिकाणी रेल्वे महामार्ग जलमार्ग व वाहतूक मार्ग यांचा मध्य आहे व येथूनच माथेरान करिता रस्ता मंजूर झाला होता परंतु अर्धवट काम झाल्यानंतर त्याचे काम का व कोणी थांबवले हा मोठा प्रश्न आहे परंतु आता शासक बदलल्यानंतर माथेरानकरांच्या पर्यायी रस्त्याच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या असून हा रस्ता पुन्हा सुरू व्हावा अशी मागणी आता जोर धरत आहे.
गव्हर्मेंट जिओ पत्रानुसार पनवेल ते माथेरान हा 18 मैलचा मंजूर झाला होता त्यापैकी पनवेल ते नेरे 4 मैल, नेरे ते गाडे 3 मैल गाडे ते मालडुंगा 5 मैल हा रस्ता पूर्ण झाला आहे तर मालडुंगा ते माथेरान हा घाट रस्ता 6 मैल बाकी आहे. संपूर्ण रस्ता मंजूर झाला असताना अर्धवट काम करून बंद केल्याचे बहुदा माथेरान हे एकमेव ठिकाण आहे. इतक्या वर्षानंतर ही अजून याकडे शासनाने गांभीर्याने पाहिलेले नाही. विशेष म्हणजे त्या वेळी माथेरान येथे संनियंत्रण समिती स्थापन झाली न्हवती, 2001 नंतर ही समिती स्थापन झाली होती.
2005 रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये माथेरानचा जगाशी जवळजवळ एक महिना संपर्क तुटला होता व त्यानंतर अनेक वर्षे मिनी ट्रेन ही बंद झाली होती. रुग्णांना झोळीतून प्रवास करावा लागला होता. आज ही माथेरानची परिस्थिती जास्त बदललेली नाही कारण एकच रस्ता उपलब्ध असल्याने पुन्हा अशी वेळ येऊ शकते. माथेरानमध्ये होणारा जोरदार पाऊस व या पावसामध्ये घाट रस्त्यावर होणारे छोटे-मोठे अपघात यामुळे माथेरानकरांना पर्यायी रस्ता असणे ही काळाची गरज आहे व आता नवीन शासन माथेरानकरांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी अपेक्षा सर्व स्थानिक नागरिक करीत आहे.