Mumbai Goa highway traffic jam Pudhari
रायगड

Mumbai Goa highway traffic jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

वाहनांच्या तासन्‌‍तास रांगा : रस्त्याच्या कामांमुळेही परिणाम

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव: गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवार या सलग तीन दिवसांच्या सुट्टयांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव शहरातील बाजारपेठेत वाहतूककोंडीने भीषण रूप धारण केले. पुणे, विदर्भ, मराठवाडा तसेच मुंबई-ठाणे येथून कोकणाकडे निघालेले पर्यटक, परत गावाकडे जाणारे कोकणवासीय आणि इतर नागरिक यांच्या वाहनांच्या तासन्‌‍तास रांगा जागच्या जागीच होत्या.

या मार्गावरील अरुंद रस्ता, वाहनांची मोठी वर्दळ आणि चालू असलेली अपूर्ण बायपास कामे यांच्या संयोगाने शहरातील बाजारपेठेत वाहतूकच ठप्प झाल्याचे दृश्य सामान्य नागरिकांसमोर उभे राहिले. त्यामुळे माणगावात वाहतूक कोंडीचा शुक्रवारी शापच दिला गेला.

माणगाव, इंदापूर येथे उभारला जाणारा बायपास हा महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याचा मुख्य मार्ग आहे. 11 किमी लांबीच्या या बायपाससाठी काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता.

तरीही गेल्या अनेक वर्षांत ठेकेदार बदलले गेले, काम अर्धवट राहिले व त्यामुळे हजारो प्रवाशांच्या ‌‘सुट्टीच्या आनंदाचा‌’ प्रवास तणावाचा राष्ट्रीय सडक मार्ग‌’ म्हणून वाहतूक कोंडीचा शाप बनला. इंदापूर-माणगाव बायपास 1 जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन रायगडच्या खासदारांनी दिले असतानाही जमिनीवरची स्थिती ‌‘जैसे थे‌’ आहे, अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

पूर्वी अभियंत्यांनीही बायपास पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. माणगाव बायपास सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पात अनेक ठेकेदार बदलले गेल्याने ठेकेदारांच्या अपूर्ण वचन बद्धता, असमर्थ व्यवस्थापन व कामाच्या गुणवत्तेतील उणीव यामुळे प्रकल्पांचा वेळ वाया जातो, त्यामुळे शासनाने ठेकेदारांवर कठोर दंड, टाकाऊ कालावधींसाठी वारंवार ठेकेदार बदलण्याची धोरणे आणि प्रकल्पांची ऑन-लाइन पारदर्शी नियंत्रण व्यवस्था लागू करणे गरजेचे ठरते.

मुंबई-गोवा महामार्ग कोकणच्या आर्थिक विकासाचा ‌‘मुख्य दुवा‌’ मानला जातो, तर त्याच दुव्यावर अरुंद रस्ते, अपूर्ण बायपास आणि वारंवार होणाऱ्या वाहतूककोंड्या यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येतो.तासन्‌‍तास अडकून पडलेल्या गाड्यांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांचा पाणी, अन्न आणि इंधनाचा प्रश्न निर्माण होतो.

त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी केवळ वाहतूक ताण यापुरत्या मर्यादित न राहता आरोग्य व सुरक्षिततेच्या प्रश्नांपर्यंत वाढत असून अशा परिस्थितीत प्रशासनाने केवळ ‌‘ट्रॅफिक ड्यूटीमधील कर्मचाऱ्यांच्या श्रमावर‌’ भर देऊन चालणार नाही, तर प्रकल्प पूर्ण करण्याच्या वेळापत्रकात खरी गांभीर्याने बदल घडवून आणणे भाग पडणार आहे.

कोकणच्या नागरिकांसाठी मुंबई-गोवा महामार्ग केवळ वाहतुकीचा मार्ग नसून आरोग्य,शिक्षण, व्यवसाय व आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा जीवन दोर आहे. अशा या दुव्यावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होणे हे शासनाच्या वारंवारच्या घोषणांच्या टोकावर ‌‘जनतेचा विश्वास‌’ खोटा ठरवण्यासारखे आहे. त्यामुळे शासन आणि ठेकेदारांनी वेळखाऊ धोरणांच्या जाळ्यातून बाहेर पडून नागरिकांच्या वेळेची आणि वाहतुकीची खरी किंमत ओळखणे आणि त्यानुसार बायपास काम तात्काळ, निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी घेणे भाग पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT