इंदापूर, माणगांव : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव आणि इंदापूर येथे शनिवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी मोठा संताप व्यक्त केला. दरम्यान सकाळ पासूनच महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला होता, तर काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले.
मतदानासाठी येणाऱ्या मुंबईकर मतदारांना मनस्ताप
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानासाठी जाताना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अवजड वाहनांवर बंदी करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. बंदी असतानाही अनेक अवजड वाहने महामार्गावरून जात असल्याचे वाहतूक कोंडी झाल्याचं या वाहतूक कोंडीत अडकलेल्या मतदारांनीच सांगीतले.
वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी महामार्ग वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत करणे अपेक्षीत होते ते झाले नसल्य़ाचे प्रवाशांनी सांगीतले. या वाहतूक कोंडीमुळे मतदानासाठी जाणाऱ्या अनेक मतदारांना मतदान करण्यासाठी विलंब झाल. प्रशासनाने बंदी आदेश मोडून महामार्गावर आलेल्या अवजड वाहनांवर कडक कारवाई करणे आवश्यक होते, मात्र तेही कुठे होताना दिसले नाही अशीही तक्रार प्रवाशांनी केली.
पुणे एक्स्प्रेस वेवरनंतर गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गेल्या दोन दिवसांपूर्वी तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. 30 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अशीच काहीशी परिस्थिती आज गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगांव येथे निर्माण होते की काय अशी भिती प्रवाशांनी व्यक्त केली.