राज्यातील पर्यटन क्षेत्रासाठी गेल्या दोन वर्षांचा काळ अत्यंत आश्वासक ठरला असून, महाराष्ट्राने देशी आणि विदेशी अशा दोन्ही स्तरांवरील पर्यटकांना आकर्षित करण्यात मोठे यश मिळवले असल्याचे राज्य शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्राची आर्थिक पाहाणी 2025-26 या अहवालातून समोर आली आहे.
भारत पर्यटन डेटा कंपोडियम 2025 च्या अहवालानुसार, 2022 मध्ये महाराष्ट्रात 15 लाख 1 हजार विदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. 2023 मध्ये हा आकडा 33 लाख 8 हजारावर पोहोचला, तर 2024 मध्ये यात आणखी वाढ होऊन ही पर्यटकांची संख्या 37 लाख 5 हजारवर गेली आहे. राज्यात विदेशी पर्यटकांच्या संख्येत 2022 च्या तुलनेत 2024 मध्ये दुपटीहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशात विदेशी पर्यटकांच्या आगमनासाठी दिल्ली विमानतळावर 38.8 टक्के तर मुंबई विमानतळावर 17.8 टक्के पर्यटकांचे आगमन झाले. येत्या काळात आता नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. दरम्यान केवळ विदेशीच नव्हे, तर देशांतर्गत पर्यटकांच्या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. सन 2022 मध्ये देशांतर्गत पर्यटकांची सख्या 11 कोटी 13 लाख होती. सन 2023 मध्ये ती 16 कोटीलाख झाली तर सन 2024 मध्ये देशांतर्गत पर्यटकांची सख्या 18 कोटी लाखावर पोहोचली आहे.अशा प्रकारे दरवर्षी राज्यातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय संरक्षित आणि तिकीट असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण स्मारकांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत राज्याने देशात आपले स्थान टिकवून आहे. 2024-25 या वर्षात महाराष्ट्रातील स्मारकांना 88 लाख 65 हजार 600 देशी आणि 1 लाख 7 हजार 400 हजार विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटकांच्या सोयीसाठी राज्यात 34 सुस्थापित निवासस्थाने आणि उपहारगृहे विकसित केली आहेत. यासोबतच पर्यटक सुविधीचे उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात 1 हजार 955 निवास न्याहारी उद्योजक नोंदवले गेले आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागात पर्यटनाला वेग मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट (आयआयएसडीए) ही देशातील पहिली संस्था विकसित करण्यात आली आहे.
तर सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे कोयना जलपर्यटन केंद्र विकसित करण्यात आले असून, मार्च 2024 पासून ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.ऐतिहासिक वारसा स्थळे, साहसी उपक्रम आणि उत्तम निवास व्यवस्था यामुळे महाराष्ट्र हे पर्यटकांचे आवडते केंद्र बनत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.