महाड : महाड नगर परिषदेच्या मालकीच्या असलेल्या कुर्ला धरणातून महाड शहराकडे येणाऱ्या सावित्री नदी पात्रातील जलवाहिनी पुराच्या पाण्याने वाहून गेली. यामुळे दक्षिण महाड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भीषण पाणीटंचाईला भर पावसात समोर जावे लागणार आहे. या संदर्भात नदीपात्रात गाळ काढण्याच्या प्रसंगी घडलेल्या घटनांच्या विरोधात नगरपरिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडे याबाबतची योग्य उपाय योजना करावी अशी मागणी केली होती.
सध्याची सुरू असलेली भीषण पूर परिस्थिती व पावसाळी मौसम लक्षात घेता येत्या चार महिन्यांमध्ये या संदर्भात कोणतीही दुरुस्ती शक्य नसल्याने या परिसरातील नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे निदर्शनास आले आहे.
पाटबंधारे विभाग आणि नदीतील गाळ काढणा-या ठेकेदारांच्या बेपर्वाईमुळे सावित्री नदीच्या पात्रातून प्रभूराम मंदिरापर्यंतची शहराला पाणीपुरवठा करणारी एक फुट व्यासाची पाईपलाईन वाहून गेली असल्याचे संध्याकाळी नगरपरिषद प्रशासनाला निदर्शनास आले आहे. पाणीपुरवठा विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर महाड नगरपरिषद प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे .
यामुळे शहराच्या दक्षिण भागातील गवळ आळी , कुंभार आळी , तांबट आळी , कवेआळी , नवी पेठ, पिंपळपार, जूनी पेठ, मधली आळी , अर्जुन भोईरोड आदी भागात आजपासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. नगरपरिषद प्रशासनाने वारंवार सुचना देऊन तसेच पत्र व्यवहार करून देखील पाटबंधारे विभाग आणि गाळ काढणारे ठेकेदार यांच्या अक्षम्य बेपर्वाईमुळे ही पाईपलाईन नदीच्या प्रवाहात वाहून गेली आहे.
गाळ काढण्यासाठी असलेल्या यंत्रांनी या पाईपलाईनच्या सभोवताली असलेल्या कॅांक्रिट चा भाग अक्षरशः ओरबाडून काढला होता. पाईपलाईनला हानी पोहचेल यासाठी कोणतीही काळजी संबंधितांनी घेतली नव्हती. मुळात ठेकेदार आणि पाटबंधारे विभागाने ही बाब गांभिर्याने घेतली नाही. नगराध्यक्ष, नगरसेवक,मुख्याधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
पाटबंधारे विभाग व ठेकेदार यांच्या बेजबाबदारपणामुळेच महाड शहरातील दक्षिण भागाला पुढील काही काळ पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तरी कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तरी नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती.संदीप जाधव , उप नगराध्यक्ष महाड