अतुल गुळवणी
अलिबाग: तरणा गेला वाया, म्हातारा आलाय सावरायला,या म्हणीनुसार नक्षत्र बदलताच पावसाचा जोर वाढू लागलाय. पुनर्वसू नक्षत्रात रजेवर गेलेला वरुणराजा दोन दिवसांपासून राज्यभरात पुन्हा सक्रिय झालेला आहे. पुढील आठवडाभर तरी या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागासह पंचांगातून व्यक्त करण्यात आलेली आहे.सोमवारी मघा नक्षत्रास प्रारंभ झाला असून,
पंचांगशास्त्रात या नक्षत्रकाळात कोसळणाऱ्या पावसाला म्हातारा पाऊसही असे संबोधतात.त्यामुळे तरण्याने हात आखडता घेतला तरी म्हातारा उरलेली कसर भरुन काढेल,असा तर्कही व्यक्त केला जात आहे.
यंदा पावसाचा लहरीपणा चांगलाच जाणवत आहे.त्याची प्रचिती मृग नक्षत्रापासून येत आहे. मृगात पावसाने पहिल्या चरणात सुरूवात केली खरी,पण त्यानंतर तो दडी मारुन बसला.पण दुसऱ्या चरणात पावसाने जोरकस हजेरी लावली.
कृषी विभागाच्या माहितीनुसार कोकणात जूनमध्ये सरासरी ९५० मिमी पावसाची गरज असते.पण प्रत्यक्षात अखेरच्या आठवड्यात पडलेल्या पावसाने दैना उडविली.सरासरी १०८१ मिमी पाऊस जूनच्या अखेरच्या आठवड्यात पडला. हा पाऊस ७ जुलैपर्यंत पडत होता.यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी,तलाव,धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली.तर रखडलेल्या शेतीकामांनाही वेग आला.
७ जुलैपासून पावसाने दडी मारली होती.त्यानंतर या पावसाचे १९ जुलैला पुनरागमन झाले. याच दरम्यान सोमवारी २० जुलैला सुर्याने मघा नक्षत्रात प्रवेश केला आहे.या नक्षत्रकाळात सुर्याचे वाहन मूषक आहे.मुषक हा प्राणी जलचर नाही.
यामुळे या नक्षत्रकाळात राज्यात मध्यमस्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता पंचांगातून व्यक्त केली जात आहे. विशेष करुन २० ते २४ जुलै तसेच २८,२९ जुलैला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याची प्रचिती दोन दिवसांपासून येत आहे.राज्यात सर्वत्र पावसाचे दमदार आगमन होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.तर धरणक्षेत्रात पाण्याचा साठा वाढू लागल्याने काही प्रमाणात चिंता मिटू लागलेली आहे.हवेतही चांगलाच गारवा निर्माण होऊ लागला आहे.
ग्रामीण भागातील म्हण प्रचलित
ही म्हण महाराष्ट्रातील शेती आणि हवामान अंदाजाशी अत्यंत जवळून जोडलेली आहे. 'तरणा' म्हणजे पुनर्वसू नक्षत्र, 'म्हातारा' म्हणजे पुष्य नक्षत्र.ही म्हण सांगते की, पुनर्वसू नक्षत्रात अनेकदा पाऊस हुलकावणी देतो (वाया जातो), परंतु त्यानंतर येणाऱ्या पुष्य नक्षत्रात पावसाचा जोर वाढून नुकसान भरून निघते आणि दमदार पाऊस होतो.
महाराष्ट्रात पावसाच्या आगमनापासून ते निरोपापर्यंत नक्षत्रांचा फार मोठा प्रभाव असतो. पुनर्वसू नक्षत्र (तरणा पाऊस): या नक्षत्रातील पावसाला 'तरणा पाऊस' असे म्हणतात. या काळात पाऊस येईल असे वाटते, पण बऱ्याचदा तो वेळेवर बरसत नाही.
पुष्य नक्षत्र (म्हातारा पाऊस): या नक्षत्रातील पावसाला 'म्हातारा पाऊस' म्हणतात. 'म्हातारा' म्हणजे अनुभवी आणि समजूतदार. या नक्षत्रात पाऊस अतिशय स्थिर, मुसळधार आणि दमदार पडतो. तो धरणीमाता तृप्त करतो, म्हणून याला 'म्हातारा आलाय सावरायला' असे म्हटले जाते.