

Varsha Gaikwad on Modi jobs promise
मुंबई: नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी देशातील तरुणांना दरवर्षी दोन कोटी नवीन रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार गेल्या १२ वर्षांत सुमारे २४ कोटी तरुणांना नवीन आणि स्थिर रोजगार मिळायला हवा होता; परंतु हे आश्वासन हवेतच विरलेले आहे. १५ ते २९ वयोगटातील सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारीचा दर सातत्याने १० टक्क्यांच्या आसपास राहिला असल्याची टीका खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
'मेक इन इंडिया' आणि 'पीएम-व्हीबीआरवाय' योजनेअंतर्गत लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने मोठे दावे केले जात आहेत. मात्र, सरकारी आकडेवारीच या अपयशाची साक्ष देत आहे.
२०१७-१८ ते २०२३-२४ या काळात उत्पादन क्षेत्रातील रोजगाराचा वाटा १२ टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत खाली आला, तर कृषी क्षेत्रातील वाटा ४४ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तरुणांना कारखान्यांतून शेतीकडे परत जाण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
देशातील तरुण आज केवळ बेरोजगारीचाच फटका सहन करत नाही, तर उपलब्ध असलेल्या मोजक्या नोकऱ्यांमध्येही शोषणाचा सामना करावा लागत आहे. पगारदार कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ४० टक्के कर्मचाऱ्यांकडे लेखी रोजगार करारही उपलब्ध नाही.
निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना ना सशुल्क रजा मिळते, ना भविष्य निर्वाह निधी किंवा आरोग्य विमा यांसारखी कोणतीही सामाजिक सुरक्षा मिळत नाही, असे त्या म्हणाल्या.