Maharashtra Pilgrims Rescue Operation
जयंत धुळप
रायगड : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या मार्गावर तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास अखेर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे शुक्रवारी (दि.२८) सकाळी ६ वाजता सर्व भाविक सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले.
अलिबाग, रायगड, ठाणे, पुणे आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासात ते सागा येथे अडकले होते. दरम्यान, या भाविकांचे काठमांडूहून परतीचे विमान शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित असल्याने त्यांना वेळेत काठमांडू गाठणे अत्यावश्यक होते.
भाविक सागा येथे अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. आवश्यक प्रशासकीय आणि समन्वयात्मक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर भाविकांच्या सुरक्षित परतीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सर्व ३७ भाविक काठमांडूच्या दिशेने रवाना झाले.
संकटाच्या काळात तातडीने मदत व सहकार्य मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले.
काठमांडूकडे रवाना झालेल्या भाविकांमध्ये प्रमोद दीनानाथ केणे, शशिकांत पणगावकर, दत्तात्रय जोशी, हेमंत मुकुंद दांडेकर, नितीन बालकृष्ण गांधी, दिनेश गांधी, बजरंग परब, संतोष अलुरकर, समीर अशोकराव घोडेराव, राकेश ज्ञानेश्वर जितेकर, श्रीकांत ढवळे, सुरेंद्र जोशी, श्रीकांत कृष्णा पाटील, आदित्य राजन देशमुख, नितीन सूर्यकांत शिरके, संजय पांडुरंग देशपांडे, विवेक अरविंद पांडे, सोनाली बेलोसारे, सुनिता पणगावकर, स्नेहा असवाद कुलकर्णी, सुवर्णा रवींद्र जोशी, वृषाली अभिजीत पुराणिक, रश्मी सेठ, पूनम सबनीस, शमा साठे, रेणुका अलुरकर, आरती विनायक काकरमठ, अपर्णा अशोक कदम, माधवी जोशी, रूचा श्रीकांत पाटील, सोनल जोशी, सीमा शिंपी, हेमलता दत्तात्रय बोरसे, अंजना राजन राजपूत, संगीता संजय देशपांडे, स्नेहा विवेक पांडे आणि वर्षा कारी यांचा समावेश आहे.