उरण : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने शाश्वत विकासाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. जेएनपीएने राबविलेल्या विविध हरित उपक्रमांमुळे बंदर परिसरातील वायुगुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून, विशेषतः धूळजन्य प्रदूषणात 33 टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या कालावधीत हवेतील पीएम पातळीत मोठी घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये 33 टक्के तर डिसेंबरमध्ये 29 टक्के घट दिसून आली. हिवाळ्यात वाढणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी जेएनपीएने यांत्रिक रस्ते-धूळ स्वच्छता वाहने आणि धूळ दमन यंत्रांचा प्रभावी वापर केला आहे. विशेषतः कंटेनर वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेल्या करळ-दक्षिण गेट मार्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
जेएनपीए आपल्या ताफ्यात वेगाने विद्युत वाहनांचा समावेश करत आहे. 10 इलेक्ट्रिक कार, 52 सीएनजी कार आणि 53 इलेक्ट्रिक ट्रक्स कार्यरत आहेत. डिसेंबर 2026 पर्यंत 150 हून अधिक इलेक्ट्रिक ट्रक्स तैनात केले जाणार आहेत. दोन बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स आणि सहा चार्जिंग पॉइंट्स आधीच कार्यान्वित असून, नवीन सुविधांसाठी 3 एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामुळे ट्रक्सच्या रांगा आणि इंजिन रिकामे चालू राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे आर्थिक वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत 12.9 कोटी रुपयांच्या डिझेलची बचत झाली. 3.65 दशलक्ष किलोग्रॅम कार्बन उत्सर्जनात घट झाली आहे.
हवेच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यासाठी जेएनपीएने विशेष स्टेशन्स उभारली आहेत. तसेच, बंदर परिसरातील हवा, पाणी आणि इतर घटकांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन केली आहे. या माहितीच्या पारदर्शकतेसाठी प्राधिकरण एनएबीएल मान्यतेसाठी प्रयत्नशील आहे.
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जेएनपीए लवकरच केंद्रीकृत कमांड ॲण्ड कंट्रोल प्रणाली विकसित करणार आहे. यामध्ये जिपीएस आधारित वाहन ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून 2-4 तास रिअल-टाइम देखरेख केली जाईल. जेएनपीएने 2030 चे 60 टक्के अक्षय ऊर्जेचे उद्दिष्ट पाच वर्षे आधीच म्हणजेच 2025 मध्ये पूर्ण करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
आमचा भर केवळ बंदर संचालनावर नसून, परिसरातील जीवनमान उंचावण्यावर आहे. वायुगुणवत्तेत झालेली सुधारणा हा प्रत्यक्ष उपाययोजनांचा परिणाम आहे. आगामी काळात पाणी गुणवत्ता आणि कचरा व्यवस्थापनावरही आम्ही भर देणार आहोत.गौरव दयाल, अध्यक्ष, जेएनपीए