श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या हरिहरेश्वर येथे भ्रमणध्वनी सेवेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी दररोज शेकडो भाविक व पर्यटक भेट देत असतात. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या मोबाईल नेटवर्कमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
हरिहरेश्वर परिसरात नामांकित दूरसंचार कंपन्यांकडून सेवा उपलब्ध असली, तरी प्रत्यक्षात नेटवर्कची गुणवत्ता अत्यंत ढासळलेली दिसून येते. पर्यटन हंगामात आणि सुट्ट्यांच्या दिवशी ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे नेटवर्क पूर्णतः ठप्प होते. परिणामी, कॉल ड्रॉप, इंटरनेट बंद पडणे, तसेच ऑनलाइन व्यवहार अडखळणे अशा समस्या वारंवार निर्माण होत आहेत.
डिजिटल भारताच्या संकल्पनेनुसार, हरिहरेश्वरमधील अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी कोड यांसारख्या डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, ‘नो नेटवर्क’ स्थितीमुळे हे व्यवहारच ठप्प होत आहेत. यामुळे पर्यटकांची नाराजी वाढत असून, स्थानिक व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ‘ग्राहक आहे, पण नेटवर्क नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हरिहरेश्वरच्या प्रदक्षिणा मार्गावर पर्यटक सेल्फीच्या मोहात धोकादायक ठिकाणी जात असल्याच्या घटना वारंवार घडतात. काही प्रसंगी जीवितहानीही झाली आहे. अशा वेळी तातडीने मदत मिळावी यासाठी अखंडित मोबाईल सेवा अत्यावश्यक असते. मात्र, नेटवर्क नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे कठीण ठरते, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या समस्येचा फटका केवळ पर्यटन व व्यवसायापुरताच मर्यादित नाही. बँका, शासकीय कार्यालये, तसेच ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनाही ‘नो कनेक्टिव्हिटी’चा मोठा फटका बसत आहे. 1 मे ते 14 जून 2026 या कालावधीत सुरू असलेल्या जनगणनेच्या डिजिटल प्रक्रियेलाही या अडचणींचा अडथळा निर्माण होत आहे.
या संदर्भात दूरसंचार कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, एकाच टॉवरवर मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा भार पडल्यास नेटवर्क जाम होते. तसेच, सतत वीजपुरवठा न मिळाल्यास सिग्नल प्रसारणात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कॉल ड्रॉप किंवा इंटरनेट बंद पडण्याचे प्रकार घडतात.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित सेवा देणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे. तसेच, पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्रे यांसारख्या संवेदनशील भागात नेटवर्क सेवा सक्षम ठेवणे अत्यावश्यक मानले जाते. त्यामुळे हरिहरेश्वरमधील या समस्येकडे केवळ तांत्रिक अडचण म्हणून न पाहता, ‘ग्राहक हक्क’ आणि ‘सार्वजनिक सुरक्षेचा’ मुद्दा म्हणून गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटक यांच्याकडून एकमुखाने मागणी केली जात आहे की, हरिहरेश्वर येथे अतिरिक्त मोबाईल टॉवर्स उभारावेत, विद्यमान यंत्रणेत सुधारणा करावी आणि अखंडित व दर्जेदार नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी. ‘दक्षिण काशी’ची ओळख टिकवायची असेल, तर केवळ धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्य पुरेसे नाही आधुनिक सुविधा देखील तितक्याच सक्षम असणे आवश्यक आहे.
हरिहरेश्वरसारख्या प्रमुख पर्यटनस्थळी वारंवार खंडित होणाऱ्या भ्रमणध्वनी सेवेमुळे आमच्या व्यवसायावर थेट परिणाम होत आहे. ग्राहक डिजिटल पेमेंटसाठी आग्रह धरतात, मात्र नेटवर्क नसल्याने व्यवहार अडकतात आणि अनेकदा गैरसमज निर्माण होतात. यामुळे व्यवसायिक आणि पर्यटक दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. आधुनिक सुविधांचा अभाव ही चिंतेची बाब आहे. संबंधित कंपन्यांनी तातडीने सेवा सुधारावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.सचिन गुरव, व्यावसायिक, हरिहरेश्वर