पनवेल : मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)कडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशाने धिंगाणा घालत सहप्रवाशांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, मी चार खून केले आहेत, पुढचा नंबर तुझा आहे, अशी धमकी दिल्याने डब्यात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रवाशांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी काही दिवसांपूर्वीच बोरिवली लोकलमध्ये झालेल्या प्रवाशाच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतची चिंता पुन्हा ऐरणीवर आली आहे.या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, संबंधित व्यक्ती लोकलच्या डब्यात मोठमोठ्याने आरडाओरडा करत होती. सुरुवातीला प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने अश्लील शिवीगाळ करत सहप्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी त्याला शांत राहण्यास सांगितले असता तो अधिकच आक्रमक झाला. यावेळी त्याने, मी चार खून केले आहेत, पुढचा नंबर तुझा, अशी धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या वक्तव्यानंतर डब्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
काही प्रवाशांनी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी धाडस दाखवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रवाशांच्या सामूहिक हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि संभाव्य अनर्थ टळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. संबंधित व्यक्तीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे का किंवा त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर लोकल गाड्या आणि स्थानकांवरील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तसेच रेल्वे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत मद्यधुंद किंवा उपद्रवी प्रवाशांविरुद्ध तातडीने कारवाई करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा
काही दिवसांपूर्वी बोरिवली लोकलमध्ये झालेल्या प्रवाशाच्या हत्येने मुंबई उपनगरीय रेल्वेतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर आता पनवेल-सीएसएमटी लोकलमधील या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करत असल्याने अशा घटनांमुळे रेल्वेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.