अलिबाग (रायगड) : शनिवार १६ ऑगस्ट रोजी सर्वत्र दहीहंडी साजरी होणार आहे. डीजेच्या तालावर ताल धरीत, राजकीय पुढाऱ्यांनी पुरस्कृत केलेले विविध रंगी टी-शर्ट घालून थरावर थर रचून लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिला गोविंदा पथकेही सज्ज झाली आहेत.
काही ठिकाणी सर्व शिबिरेही घेण्यात आली. हा थरार पाहण्यासाठी रायगडकरांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गोकुळाष्टमीनिमीत्त शनीवारी जिल्ह्यात ८ हजार ९७९ दहीहंड्या फोडण्यात येणार आहेत. यामध्ये राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या लाखो रुपये बक्षीसाच्या काही दहीहंड्या लक्षवेधी ठरणार आहेत.
उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच महिला गोविंदा पथकेही असल्याने त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. रायगड जिल्ह्यात दरवर्षी दहीहंडी हा उत्सव 'सण' म्हणूनच साजरा करण्याची पद्धत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा सणच राजकीय पक्षांनी हायजॅक केला असून, त्याचा फायदा घेण्यासाठी राजकीय मंडळींमध्येच जोरदार स्पर्धा सुरू झालेल्या दिसून येतात. परिणामी दहीहंडी उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच आगामी जिल्हा परिषद महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसे ठेवण्यात आली आहेत यावर्षी लाडक्या बहिणी प्रमाणेच महिला गोविंदा पथकाला हि आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यात ८ हजार ९७९ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. यामध्ये ७ हजार ०७२ खासगी तर १ हजार ९१७ सार्वजनिक दहीहंड्यांचा समावेश आहे. उत्सवानिमित्त काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारपासून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. एकूण ३५५ ठिकाणी मिरवणूका पारंपारिक पध्दतीने काढल्या जाणार असून या दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत.
जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमेची बक्षीसे लावण्यात आली आहेत. यामुळे या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी मागील महिनाभरापासून कसून सराव केला आहे. आयोजकही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत आहेत. दहीहंडी उत्सवाच्या अटींचे पालन करण्यात येत आहे. गोविंदांचा विमा काढण्यात आला आहे.
एकीकडे गोकुळाष्टमीला स्पर्धेचे स्वरुप आले असले तरी ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला साजरा होत आहे. आदल्या दिवशी श्रीकृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी पारंपरिक वाद्यांसह पूजाअर्चा होताना आजही दिसून येत आहे.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जिल्ह्यात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये १५० पोलीस अधिकारी, ९५० पोलीस कर्मचारी, ३५० होमगार्ड, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून ७३ वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी या कालावधीत असणार आहे.